मंत्री मुरुगेश निराणी यांची माहिती : उद्योजकांना 90 दिवसांत घरपोच मिळणार एनओसी
प्रतिनिधी / बेंगळूर
महसूल, परिवहन, वन आणि पर्यावरण खात्यांसाठी एक खिडकी पद्धत (सिंगल विंडो) जारी करून उद्योजकांना 90 दिवसांत घरपोच एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) पोहोचविण्याची व्यवस्था जारी करण्यात येईल, अशी घोषणा खाण आणि भूविज्ञान मंत्री मुरुगेश निराणी यांनी केली. येथील राजवाडा मैदानावर फेडरेशन ऑफ कर्नाटक क्वॉरी आणि स्टोन क्रशर्स उद्योजकांनी आयोजिलेल्या साक्षरता अभियानाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
क्वॉरी आणि खाण उद्योजकांना अनुकूल व्हावे यासाठी चार खात्यांचा समावेश असणाऱया खात्यांसाठी एकत्रितपणे सिंगल विंडो व्यवस्था जारी करण्यात येईल. याद्वारे अर्ज केलेल्यांना 90 दिवसांत खात्याच्यावतीने घरपोच ना हरकत प्रमाणपत्र पोहोचविण्याची व्यवस्था जारी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
चार महसूल विभागांत खाण अदालत
उद्योजकांना एका खात्याकडून दुसऱया खात्याकडे करावी लागणारी धावपळ थांबविण्यासाठी किनारपट्टी भागात मंगळूरमध्ये स्वतंत्रपणे आणि राज्यातील चार महसूल भागात खाण अदालत घेण्यात येतील. उद्योजकांच्या समस्या जागीच सोडविण्यास अनुकूल होईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
खाण व भूविज्ञान खाते जनस्नेही आणि जनतेला अनुकूल असावे, असा आपला हेतू आहे. उद्योजकांना कोणत्याही प्रकारच्या कायदेविषयक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी कायदे शिथिल करण्यात येत आहेत. उद्योजकांना योग्य व्यासपीठ निर्माण करून देण्याबरोबरच रोजगारवाढीचे उद्दिष्टही बाळगण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
वन टाईम सेटलमेंट स्कीम
उद्योजकांना सध्या पाच पट दंड लागू करण्याचा नियम खाण-भूविज्ञान खात्यामध्ये आहे. सुमारे 6,700 कोटी रुपये महसूल या माध्यमातून येणे बाकी आहे. त्यामुळे यापुढे ‘वन टाईम सेटलमेंट स्कीम’ सुरू करण्यात येईल. जिल्हा खाण निधी (डीएमएफ) सध्या 30 टक्के आहे. हे 10 टक्क्यावर आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे. त्यामुळे ही मागणी सरकारपुढे मांडण्यात येईल. उद्योजक जीएसटी व इतर कर भरतात. यामुळे सरकारला कोटय़वधींचा महसूल मिळतो. त्यामुळे सरकारने उद्योजकस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी नवे धोरण आणले आहे, असे मंत्री मुरुगेश निराणी यांनी सांगितले.
उद्योजकांच्या समस्यांची जाणीव
लवकरच खाण-भूविज्ञान खात्यातर्फे जनतेला पूरक आणि जनस्नेही खाण धोरण जारी करणार आहे. त्यामध्ये उद्योजकांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल. देशाला आदर्श ठरेल असे खाण धोरण जारी केले जाणार आहे. आपण स्वतः उद्योजक आहे. त्यामुळे उद्योजकांच्या समस्यांची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळे तुमच्या मागण्या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासमोर मांडून त्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येईल.
सर्व जिल्हय़ांत खनिज भवन…
राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये खाण-भूविज्ञान खात्यातर्फे लवकरच खनिज भवन सुरू करण्यात येईल. काही जिल्हय़ांमध्ये खनिज भवन नसल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व जिल्हय़ांमध्ये खनिज भवन निर्माण करण्यात येतील. त्यामुळे खात्यासंबंधी कामे करणे अनुकूल होईल.
– मुरुगेश निराणी, खाण-भूविज्ञान मंत्री