ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरुन देशातील वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केंद्र आणि योगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शनिवारी रात्री याप्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एकंदरीत या सर्व प्रकारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदूस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडविण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसले, असे राऊत यांनी म्हटले आहे.
लखीमपूर खेरी जिह्यात आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा आज कुणालाही अटक करीत सुटलेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने प्रियंका गांधींमध्ये दिसले, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱयांच्या कुटुंबीयांनी भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. तसेच बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. या घटनेचा राऊत यांनी निषेध केला आहे. इंदिरा गांधींच्या नातीला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशाने पाहिले. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल’, असेही नमूद केले आहे.