श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याची मोहीम सुरू आहे. रविवारी दिवसभरात आणखी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये एका कमांडरचा समावेश असून गेल्या चार महिन्यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि अन्सर घझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांचा समावेश असल्याची माहिती काश्मीर विभागचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.
श्रीनगरमधील जैदीबल भागात दहशतवादी लपल्याची माहिती रविवारी सकाळी सुरक्षा दलाला मिळाली होती त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान मोबाईल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. दहशतवाद्यांना घेरल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केल्यानंतर चकमक उडाली. या संघर्षात भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय सैन्य दलासोबत एसआरपीएफ, क्मयूआरटी, 115 बटालियन, 28 बटालियन तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. खात्मा करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे 2019 पासून दहशतवादी कारवायात सक्रीय आहेत. तर गेल्या महिन्यात बीएसएफच्या दोन जवानांवर जो हल्ला झाला होता त्यात यातील एकाचा सहभाग होता, असेही आयजीपींनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांकडून एके-47 रायफलसह काडतुसे व शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.