इंदोर / वृत्तसंस्था
अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समिती मार्च महिन्यात चार दिवसांच्या कसोटी सामन्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीसह जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडूंनी या नव्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर, आयसीसीचा रोख या बैठकीत स्पष्ट होणे अपेक्षित आहे. दि. 27 ते 31 मार्च या कालावधीत दुबईत ही बैठक होणार आहे.
‘तांत्रिक समितीचा मी एक घटक असल्याने या प्रस्तावाबद्दल काय वाटते, हे मी सांगू शकणार नाही. पण, बैठकीत त्यावर चर्चा झाल्यानंतर मी याबद्दल कळवेन’, असे अनिल कुंबळे वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. ऍन्ड्रय़्रू स्ट्रॉस, राहुल द्रविड, महेला जयवर्धने, शॉन पोलॉक यांचाही कुंबळेसह आयसीसी क्रिकेट समितीत समावेश आह. जागतिक स्तरावरुन या नव्या संकल्पनेला बराच विरोध असताना शेन वॉर्न, मार्क टेलर व मायकल वॉन यांनी मात्र त्याचा पुरस्कार केला आहे. मागील वर्षी इंग्लंड-आयर्लंड यांच्यात चार दिवसीय कसोटी झाली तर 2017 मध्ये दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे यांनीही चार दिवसीय एक कसोटी खेळली आहे.