अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 10 जुलै 2021, सकाळी 9.30
●कराड, साताऱ्याची स्पर्धा थांबेना ●कृष्णेच्या निवडणुकीवरून कराडच्या बाधित वाढीचा संशय ●कोरेगाव तालुका तिसऱ्या क्रमांकावर ●वाई, फलटण आणि खंडाळामध्ये बाधितांचा ब्रेक लागेना ●जिल्ह्यातील मृत्यू दर आटपेना
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना कहर काही केल्या थांबत नाही. कराड आणि सातारा तालुक्यामध्ये चढाओढ सुरू आहे. कराडला कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीमुळे बाधित वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सातारा तालुक्यातील प्रमाण वाढण्यामागे कोणते कारण आहे, हे प्रशासनाला उमजू शकले नाही.
कोरेगाव तालुका तिसऱ्या क्रमांकावर असून, जिल्ह्यातील मृत्युदर ही कमी होत नाही. वाई, फलटण, खंडाळा या तालुक्यात नव्याने बाधित होण्याला ब्रेक काही केल्या लागेना अशी परिस्थिती जिल्ह्यातील आहे. काल चोवीस तासात 12,311 टेस्ट झाल्या असून, 872 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने 7.06 एवढी पॉझिटिव्हीटी आली.
सातारा जिल्हा कोरोनामुळे बेजार झाला आहे. कोरोना बाधित होणारे दररोज नवनवीन आकडे दिसत आहेत. गेल्या चार दिवसांनंतर हजारच्या पुढे जाणारा आकडा काल दिवसभरात 872 वर आला आहे. गेल्या चोवीस तासात 12,311 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या असून, पॉझिटिव्हीटी रेट 7.06 वर आला आहे. काल दिवसभरात कराड तालुका अग्रेसर असून सातारा तालुका दोन नंबरला आहे. जर कराड तालुक्यातील कोरोनाचा आकडा वाढण्याला कृष्णा कारखान्याची निवडणूक कारणीभूत ठरवली जात असेल तर सातारा तालुक्यातील तशी कोणती निवडणूक झाली नाही. मात्र, सातारा शहरात हॉस्पिटलची संख्या जास्त असल्याने आणि बाहेरच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी जास्त संख्येने येतात त्यामुळे आकडा जास्त असावा असा संशय व्यक्त होत आहे. सातारा शहरात वातावरण चांगले असताना कोरोना बाधित होणारे स्वतःच उपचार करण्यासाठी जंबो, सिव्हिल किंवा कोरोना केअर सेंटरचा आधार घेत आहेत.
शहरातील रुग्ण संख्या एवढी मोठी नसून जे बाहेरच्या तालुक्यातील सातारा येथे उपचार घ्यायला येतात. त्यांच्यामुळे प्रमाण वाढते दिसत आहे, असा प्रशासनाचा निष्कर्ष आहे. कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात पुन्हा कोरोनाचा प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे कोरेगाव तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच फलटण तालुक्यातील चित्र काहीसे वेगळे नाही. तालुक्यातील शहराची पॉझिटिव्हीटी जास्त आहे. खंडाळा आणि वाई या दोन तालुक्यातील बाधितांचा आकडा गेल्या दोन दिवसात वाढताना दिसत आहे.खटाव, माण या दुष्काळी तालुक्याबरोबर महाबळेश्वर आणि जावली या पश्चिम भागातील तालुक्यातील संख्या काहीशी कमी झाली आहे. दरम्यान, मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यातील काही केल्या कमी येईना, असे चित्र आहे.
सरकारी वा खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेला रुग्ण बरा होऊन परत येण्याचे प्रमाण कमी आहे. संस्थात्मक विलगीकरणं कक्षात उपचार घेत असलेले रुग्ण बरे होत आहेत. परंतु ज्या रुग्णांना जास्त त्रास होतो. त्यांना मरणाच्या दाढेतुन परत आणण्यासाठी प्रशासन कमी पडत आहे. त्याला प्रशासकीय पातळीवरच ज्या उपाययोजना व दिले जाणारे उपचार यामध्ये कमतरता असावी, अशी ही शक्यता व्यक्त होत असून, त्यामुळे मृत्यूदर कमी होत नाही. त्यामुळे खाजगी वा सरकारी रुग्णालयावरील विश्वास सर्वसामान्यांचा उडू लागला आहे. यासाठी प्रशासनाने त्या बाजूने उपाययोजना कराव्यात असाही विचार पुढे येत आहे.
शनिवारपर्यत नमुने….1,11,67,836 बाधित…2,02,538 मुक्त…1,88,051, मृत्यू….4868 उपचारार्थ…9434