प्रतिनिधी/ सातारा
ऐतिहासिक अशा सातारा शहरात प्रमुख रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. हे रस्ते शहरातील मुख्य दळणवळणाचे आहेत. याकडे पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. राजवाडा ते समर्थ मंदिर, शाहू चौक ते समर्थ मंदिर या रस्त्याचे काम चार दिवसांत पालिकेने सुरू केले नाही तर त्याच रस्त्यावर नागरिकांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शहरातील महत्वाच्या रस्त्यामध्ये शाहू चौक ते समर्थ मंदिर, समर्थ मंदिर ते राजवाडा यांचा समावेश होतो. या रस्त्यावरुन दररोज परळी, कास भागातून येणाऱया नागरिकांची आणि मूळ सातारा शहरातील नागरिकांच्या हक्काचा रस्ता आहे. या दोन्ही रस्त्यांचा वापर हा केसरकर पेठ, माची पेठ, मंगळवार पेठ, बोगदा, यादोगोपाळ पेठ आदी पेठेतील नागरिक करतात. गतवर्षीपासून हे दोन्ही रस्ते खराब झाले आहेत. मी कित्येक वेळा स्वखर्चाने या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ामुळं अनेक अपघात होत आहेत. तसेच अनेकांना कायमचे अपगंत्व आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करावे, यासाठी नागरिक व प्रवाशी सतत मागणी करत आहेत. आम्हाला नगरसेवक म्हणून नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार येत्या चार दिवसात या दोन्ही रस्त्याची कामे करण्यात यावेत, अन्यथा त्याच रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक जांभळे यांनी दिला आहे.