काळम्मा बेलेवाडीचे युवा सरपंच सागर पाटील यांचे निधन
प्रतिनिधी / सेनापती कापशी
काळम्मा बेलेवाडी ता. कागल येथील पहिले लोकनियुक्त युवा सरपंच सागर यशवंत पाटील (वय ३६ ) यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांनी गेले चार दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली.
सरपंच सागर पाटील यांची तबेद बिघडल्याने त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात ४ सप्टेंबरला उपचारार्थ दाखल केले. त्यांना जादाच त्रास होत होता. पण सर्वत्र कोरोनाने दवाखाने फुल्ल असल्याने बेड उपलब्ध झाला नाही. आज मंगळवारी सकाळी प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांना बेळगांवला हलवण्यात आले होते. तेथील दवाखान्याच्या दारातच ह्रदय विकाराचा तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. सरपंच पाटील यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सरपंच सागर पाटील हे बालपणापासूनच मंत्री मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून वावरत होते. त्यांच्याकडे संघटन कौशल्य असल्याने त्यांनी गाव आणि परिसरात आपला मोठा मित्र परिवार जमा केला होता. विकास सेवा संस्था सचिव म्हणून काम करीत तालुका युवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते झाले. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीत सागर पाटील यांचे मोलाचे योगदान होते.
दोन वर्षापूर्वी गावची ग्रामपंचायत निवडणूक लागली. प्रथमच थेट निवडणूक होताना सरपंचपद खुले झाले होते. मंत्री मुश्रीफ गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. येथे काट्याची लढत असतानाही सागर पाटील यांना विजयी केले. ग्रामपंचायतही मुश्रीफ गटाने जिंकली. गावातील पहिले लोकनियुक्त आणि सर्वात तरुण सरपंच म्हणून सागर पाटील यांना मान मिळाला. दोनच वर्षात त्यांनी विकासकामांचा धडाका लावला. मात्र अतिशय मनमिळाऊ, होतकरू असलेल्या सागर पाटील यांच्या आकस्मिक निधनाने गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. हळहळ व्यक्त होत आहे. चारच महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचेही आकस्मिक निधन झाले आहे. त्या धक्क्यातून पाटील कुटुंब सावरते न सावरते तोपर्यंत होतकरु कर्त्या तरुण मुलाचे निधन झाल्याने कुटूंबियांनी फोडलेला हंबरडा ह्रदय पिवटळून टाकणारा होता. सरपंच पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, एक विवाहीत बहीण असा परिवार आहे.