मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, देवगडचा समावेश : पाच वर्षांची मुदत संपल्याने कार्यवाही
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
पाच वर्षांची मुदत संपणाऱया सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तीन नगरपालिका आणि देवगड-जामसंडे नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. नगर पालिकांवर प्रांताधिकारी आणि नगर पंचायतीवर तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश नगरविकास खात्याने जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नगर पालिकांच्या निवडणुका वेळेत घेता आल्या नसल्याने पाच वर्षांची मुदत संपणाऱया नगरपालिका व नगर पंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश नगरविकास खात्याने जिल्हाधिकाऱयांना काढले आहेत. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण व वेंगुर्ले नगर परिषदेची पाच वर्षांची मुदत 21 डिसेंबरला संपली असल्याने या दोन्ही नगर परिषदांवर मंगळवारपासूनच प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. मालवण नगर परिषदेवर थेट नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे महेश कांदळकर निवडून आले होते. तर वेंगुर्ले नगर परिषदेवर भाजपचे राजन गिरप नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांची पाच वर्षांची मुदत संपली आहे.
सावंतवाडी नगर परिषदेची पाच वर्षांची मुदत 22 डिसेंबरला संपत असून त्या दिवसापासून प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब निवडून आले होते. आता तीनही नगर परिषदांवर निवडणूक होईपर्यंत प्रशासक राहणार आहे. प्रशासक म्हणून प्रांताधिकारी कारभार सांभाळणार आहेत. सहा महिन्यांच्या आत निवडणूक होणे आवश्यक असल्याने लवकरच नगर पालिकांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्मयता आहे.
सध्या निवडणूक कार्यक्रम सुरू आलेल्या देवगड-जामसंडे नगर पंचायतीचीही मुदत 22 डिसेंबरला मुदत संपत असल्याने या नगर पंचायतीवरही प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर पंचायतीचा प्रशासकीय कारभार तहसीलदारांजवळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असल्याने 19 जानेवारी रोजी निवडणूक निकाल लागल्यानंतर प्रशासकीय कारभार संपुष्टात येणार आहे.
देवगडबरोबरच वैभववाडी, कुडाळ आणि दोडामार्ग नगर पंचायतींचाही निवडणूक कार्यक्रम सुरू असून या तीनही नगर पंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. त्यामुळे या तीनही नगर पंचायतींवर पूर्वीच प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. 19 जानेवारीला निवडणूक निकालानंतर या ठिकाणीही प्रशासकीय कारभार संपणार आहे.