भारतामध्ये पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धत असायची. मुलांनी व मुलींनी एक ठरावीक वय पार केले की ते आपल्या गुरुच्या घरी रहायलाच जायचे. मग तिकडे पुस्तकी शिक्षणाबरोबर त्यांना शिस्त, व्यावहारिक कौशल्ये आणि दैनंदिन क्रियाकला देखील शिकायला मिळायच्या. याची त्यांना एक स्वतंत्र आयुष्य जगायला मदत व्हायची. त्या काळात ना स्मार्टफोन होते ना जागतिकीकरण. त्यामुळे माणसाला जीवनावश्यक कौशल्ये शिकण्यापासून काही पर्याय नव्हता.
तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणाच्या विकासामुळे आज बऱयाच गोष्टी सहज शक्मय होतात. माणसाला घरबसल्या सगळय़ा गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे आयुष्य सोपे नक्कीच झाले आहे. पण आज माणूस तंत्रज्ञानावर अवलंबून असल्यामुळे, त्याला आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज वाटत नाही. म्हणूनच अनेक वेळा आपण या मूलभूत जीवन कौशल्यांना गृहित धरतो.
पुस्तकी शिक्षण जसे ज्ञानात भर पडायला मदत करते तसेच व्यावहारिक कौशल्यांचे ज्ञान त्या पुस्तकी ज्ञानाला वास्तवात कसे वापरायचे याचा अनुभव देते. भारतीय शालेय शिक्षण पद्धतीमध्ये जर पुस्तकी ज्ञानाबरोबर या व्यावहारिक ज्ञानाचेसुद्धा शिक्षण दिले तर माणूस फक्त ज्ञानी होणार नाही तर एकूणच कुशल व्यावसायिक बनू शकेल. माणूस कितीही मोठा आणि यशस्वी झाला तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या जीवनात आवश्यक आहेत. अशाच काही जीवनावश्यक गोष्टी लहानपणापासूनच मुला-मुलींना शाळेमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजेत. जसे की,
1. आर्थिक व्यवस्थापन
पैसा हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकजण तो कमवायला प्रयत्न करतच असतो. पण पैसा कसा हाताळायचा, त्या राज्यातील आर्थिक कायदे काय आहेत, कर कसा भरायचा, या सगळय़ाचे शिक्षण कोणीच देत नाही. तारुण्यात असतानाच माणूस जर आर्थिक व्यवस्थापन शिकला तर त्याच्या मानधनाचा पुरेपूर आणि सकारात्मक वापर त्याला करता येईल. पैशामुळे मिळालेल्या सोयी आणि प्रसिद्धी या पलीकडे जाऊन पैशाची किंमत यामुळे माणसांना लक्षात येऊ शकते. देशाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असली तर माणूस योग्य ठिकाणी पैसे गुंतवून त्याचा जास्तीत जास्त नफा प्राप्त करू शकतो.
2. प्रथमोपचार आणि जीवनावश्यक डावपेच
निकडीचा प्रसंग कधी कसा समोर येईल काही सांगता येत नाही. माणसाचे आयुष्य जितके सुंदर आहे तितकेच अप्रत्याशित आहे. अशा वेळेला आपत्कालीन स्थितीमध्ये जर प्रत्येकाला मूलभूत प्रथमोपचार येत असेल तर ते स्वतः व दुसऱयाचा जीवदेखील वाचवू शकतात. प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक हेच सांगतो की आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय मदत पोहोचण्याआधीसुद्धा प्रथमोचार करणे खूप गरजेचे असते. जर वैद्यकीय मदतीसाठी थांबलो तर गोष्टी हातातून निसटू शकतात. त्यामुळे, तुमच्या मुलाला पुढे जाऊन एक कलाकार जरी व्हायचे असले, तरीही त्याला किंवा तिला या जीवन वाचणाऱया कौशल्याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे.
3. मानसिक आरोग्याचे महत्त्व
शारीरिक स्वास्थ्य हे थेट मानसिक आरोग्याशी जोडलेले आहे यात काही वादच नाही. माणसाचे मन स्थिर असेल तरच तो त्याच्या ऊर्जेचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकतो. शालेय शिक्षणात शारीरिक, बैठे खेळ भरपूर खेळले जातात. ‘पीटी’च्या तासाला मुले मैदानावर पूर्ण जोशाने खेळताना दिसतील. पण तीच मुले परीक्षा जवळ आल्या की तणावाखाली येतात. या स्पर्धेचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. ताण आणि वेळ व्यवस्थापन जर का लहान मुलांना सकारात्मकरित्या शिकवले, तर कठीण परिस्थितीला घाबरून न जाता, ते प्रत्येक आव्हान गणनात्मकरित्या सोडवायला शिकतील. एवढेच नव्हे, तर मन प्रसन्न असल्याने ते इतरांमध्येदेखील प्रसन्नतेची भावना निर्माण करू शकतील.
4. सर्जनशीलता
भारतात आजही विविध व्यवसायांबद्दल भेदभाव केला जातो. डॉक्टर आणि इंजिनिअरला जो मान-सन्मान मिळतो तो इतर व्यवसायांना नाही मिळत. जसे की मानसशास्त्रज्ञ, कलाकार, प्रशासक इत्यादी. आजही हे व्यवसाय बऱयाच ठिकाणी निषिद्ध मानले जातात. मग त्या विषयात प्रतिभा असूनही मुलांना ते क्षेत्र निवडण्याची भीती वाटू लागते. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे की, ‘कोणतेही काम मोठे किंवा छोटे नसते.’ माणसाला ज्यात आनंद मिळतो आणि ज्यात रुची आहे, तेच काम त्याने करावे. कारण नावडते काम समाजाच्या दबावाखाली येऊन केले, तर सफल होणारच नाही. काळजी एवढीच घेतली पाहिजे की आपल्या कामाचा कोणाला त्रास होत नाही आणि देशाच्या किंवा समाजाच्या उद्धारासाठी आपल्या कामाचे योगदान झाले पाहिजे. कारण जर विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान हे सर्व जग चालवत असतील, तर कला, संगीत, कथाकथन आणि सर्जनशीलता या सर्व गोष्टी माणसाला जगायची ऊर्जा देतात. त्यामुळे मुलांच्या आवडीची कला त्यांना जपू द्यावी. त्यांना पुढे जाऊन फक्त यशस्वी नाही, तर आनंदी रहायचे प्रोत्साहन दिले पाहिजे.
जग खूप मोठे आणि खूप सुंदर आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱयात अपरंपार ऊर्जा भरलेली आहे. शाळेच्या चार भिंतींच्या पार जाऊन जगाकडे कुतूहलाने पहायला शिकवणे ही काळाची गरज आहे. पुस्तकी ज्ञान हे महत्त्वाचे आहेच. त्यामुळे माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. पण या इतर गोष्टींमुळे माणसाच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल होतो.
जरी आपण गुरुकुल प्रणाली परत आणली नाही तरी आपण आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये गुरुकुल शिक्षणाचा अर्थ आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो. फक्त स्वतःपुरता नाही, तर जगाचा नागरिक कसा झाला पाहिजे हे आपल्या मुलांना शिकवू. कारण शिक्षण हे फक्त यशस्वी होण्यासाठी नाही, तर एक जाणकार नागरिक आणि समाजाचा सदस्य म्हणून दिले पाहिजे. दृष्टिकोनामधले हेच काही छोटे बदल, उद्या जगाच्या उद्धारामध्ये हातभार
लावतील!
-श्राव्या माधव कुलकर्णी