शाहुनगरातील नागरिकांनी कचरा टाकू नये, असे केले आवाहन : जेसीबी लावून आरोग्य विभागाने केली स्वच्छता मोहिम
प्रतिनिधी / सातारा
अलिकडच्या काही वर्षामध्ये सातारा शहरातील ऐतिहासिक अशा चारभिंतीकडे जाणाऱया रस्त्यावर कोणीही जातायेता कचरा टाकत असते. त्यामुळे चार भिंतीकडे जाणारा केसरपेठेतील रस्ता हा उर्किडा नागरिकांनी केलेला आहे. पूर्वी त्रिशंकू भाग होता त्यामुळे पालिकेला कचरा उचलता येत नव्हता. आता उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लगेच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्याचे काम करवून घेतले. शाहुनगर व परिसरातील नागरिकांनी येथे कचरा टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.
ऐतिहासिक असलेल्या चार भिंतीकडे शाहु चौकातुन जाणाऱया रस्त्याच्या कडेला कोणीही जातायेता कचरा टाकत असते. गाडीवरुन घरातला कचरा फेकून लगेच पसार होण्याचा कार्यक्रम नित्याचीच बाब दिसून येते. यापूर्वी हा केसरकर पेठेतून जाणारा हा रस्ता पालिकेच्या हद्दीत येत नव्हता. आता मात्र, सातारा शहरात हद्दवाढ झाल्याने हा परिसर आला आहे. त्यामुळे शहराचा भाग बनल्याने शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडें यांनी स्वतः आरोग्य विभागाची बैठक घेवून कामाबाबत सुचना दिल्या. केवळ सुचना करुन ते थांबले नाहीत तर स्वतः जाग्यावर जावून तेथील पालिका कर्मचाऱयांकडून कचरा उचलून त्याची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट कशी लावायची त्याबाबत सुचना दिल्या. चार भिंतीचा हा रस्ता अतिशय खराब झाला होता. आता मात्र, स्वच्छ केला असुन नागरिकांनी या रस्त्यावर घाणीघाण करु नये, असे आवाहन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केले आहे.