ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल संभ्रमावस्था : ग्रामस्थांनीच आवाज उठविण्याची आवश्यकता
वार्ताहर /कडोली
गेल्या चार वर्षापासून ग्रामसभेचे आयोजन नसल्याने कडोली ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आता नूतन अध्यक्षा, उपाध्यक्षा तरी ग्रामसभा बोलावणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती मिळावी, जनतेला याचा लाभ मिळावा, योग्य लाभार्थीनाच घरे मिळावीत, गावपातळीवर असलेल्या समस्या सर्वांसमोर मांडल्या जाव्यात आणि त्याचे निवारण व्हावे आणि विविध मुद्यावर चर्चा होण्यासाठी शासनाने ग्रामसभेच्या आयोजनाचा प्रयत्न चालविला आहे. निदान वर्षाला दोनवेळा तरी ग्रामसभेचे आयोजन करने गरजेचे आहे. परंतु याला कडोली ग्रामपंचायतीने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. तब्बल चार वर्षे झाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले नसल्याने लख्ख उजेडातही आपण अंधारातच चाचवडत आहोत की काय अशी प्रचिती ग्रामस्थांना आली आहे. कोणत्या योजना आल्या आहेत, शासकीय घरे कोणाला मिळतायेत याचा थांगपत्ता लागत नाही. राजकारणाच्या दृष्टिकोणातून ज्यांची बाजू वरचढ आहे अशांना घरे लवकर उपलब्ध होतात की काय? अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे. ग्रामसभाच नसल्याने आपली मागणी आणि समस्या कोणाजवळ मांडायच्या असा प्रश्न सर्वसामान्य गरीब कुटुंबांना पडला
आहे.
जलमिशन योजनेचे काम संथगतीने चालू असल्याने समस्या
गेल्या चार वर्षात कोणकोणाला घरे उपलब्ध झाली आहेत. शासनाकडून किती घरे मंजूर झाली आहेत. याची माहिती ग्रामसभेतून ग्रामस्थांना मिळणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी जलमिशन योजनेचे काम संथगतीने चालू असल्याने ग्रामस्थांसमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. गावात काही पाईपलाईनच्या चरी खोदून तशाच ठेवल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप पाणी पुरवठा सुरू नाही. गावात काही ठिकाणी पाण्याचा सुकाळ तर काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे. या सर्व समस्या मांडायच्या कोणासमोर असा प्रश्न ग्रामस्थांसमोर पडला आहे.
‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ विरोधी पक्षाची भूमिका
विरोधी पक्षाने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली आहे. ग्रामसभा घ्यावी यासाठी विरोधी पक्ष आवाज का उठवत नाही अशी चर्चा ग्रामस्थांत होत आहे. तेव्हा जागृत ग्रामस्थांनी याबद्दल आवाज उठवून ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेण्यासाठी भाग पाडणे आता काळाची गरज बनली आहे.