वैराग / प्रतिनिधी :
आजपर्यंत तुम्ही वीजबिल वाढवून आलेले एैकले असेल, पण ज्याच्या शेतात वीज नाही अशा शेतकऱ्यालाच जर अव्वाच्या सव्वा बिल आले तर, हो हा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यातल्या धामणगाव ( दु ) येथे घडला आहे.ना लाईटचा पोल, ना विद्युततार, ना विद्युत जोडणी ,ना मिटर तरीही थेट शेतकऱ्याला वीज बिल आले आहे तेही तेरा हजार सहाशे रुपये ! अशा विद्युत मंडळाच्या अंधाधुंदी कारभाराला बिभिषण यादव देशमुख हे शेतकरी बळी पडले आहेत. हे गेल्या चार वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत……
मोलमजुरी करुन बिभिषण यादव देशमुख यांनी धामणगावच्या माळावर आठ एकर जमिन घेतली. वीज मंडळाची भेट घेऊन लाईट मिळणार म्हटल्यावर मोठ्या धाडसाने उजाड माळावर बोर पाडला. कष्टाला नशिबाची साथ मिळाली आणि पाणीही चांगले लागले. पण व्यवस्थेने घात केला गेल्या आणि चार वर्ष ओलांडले तरी लाईट शेतात पोहचली नाही. पण बिल मात्र पोहचले.
देशमुख यांचे हे काम कोटेशन भरल्यानंतर इंन्फ्रा टू मध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याची वर्क ऑर्डरही निघाली मात्र काम काय झालेच नाही. त्यानंतर तत्कालीन अधिकाऱ्यांनी तुमचे काम एचव्हीडीएसच्या नविन स्किममध्ये करु असे आश्वासन दिले. पण पुन्हा निराशाच पदरी पडली. देशमुखांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना अस्तित्वात नसलेल्या विद्युत जोडणीचे बिल आले. ते सुध्दा तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये, विशेष म्हणजे लाईट नसताना २२५६ युनिट वीज वापरल्याचा जावई शोध महावितरणने लावला आहे. लाईट नसल्याने मीटर येण्याचा संबधच नाही. तरीही ०८२१००३९६२७या क्रमांकाचे मीटर देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे.केवढा मोठा सावळा गोंधळ वीज मंडळाकडून घातला जात आहे ते दिसून येते. पोल उभारणी, तारा जोडणी, विद्युत जोडणी, विद्युत वहन परीक्षण,मंजुरी, मीटर जोडणी ह्या गोष्टी तर कुठे आढळून आल्याच नाहीत.
स्थानिक विज मंडळाच्या कार्यालयाने हे जाणून बुझुन दुर्लक्षित केल्याचे निदर्शनास येत आहे.शेतीचा विकास करता यावा म्हणून वयाच्या सत्तरीत झटणाऱ्या देशमुखांना वीज नाही पण वीजबिल मिळाले. त्यांच्यानंतर शेजारी पाजारी वीज आली देशमुख मात्र उपेक्षितच राहीले.चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो, उठता बसता गुडघे दुखतात पण लाईट येईल या आशेने त्यांचा पाठपुरावा
कुणानाकुणा कडून सुरु आहे. त्यांच्या मागणीनंतर त्यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहचली मात्र देशमुख तसेच राहीले. आता विजजोडणीसाठी उपोषण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. मात्र शरीर साथ देत नाही पण तरीही वीज मंडळाच्या दारात तर मरीन असे सांगून आपली जिद् कायम असल्याचे दाखवून देतात.
आता ते स्व हक्कासाठी उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.