मुंबई-रत्नागिरी-मालवण प्रवास : ग्रामपंचायतीने पाठविले रुग्णालयात
प्रतिनिधी / मालवण:
मुंबईहून चालत रत्नागिरीत व तेथून दुचाकीने मालवणला आलेल्या युवक-युवतीची रवानगी तारकर्ली स्कुबा डायव्हींग येथील विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. सदरचे युवक-युवती हे दोघेही मुंबईहून रेल्वे ट्रकवरून पायी प्रवास करीत रत्नागिरीतील दापोली येथे पोहोचले होते. तेथून एका भाजीच्या टेम्पोमधून त्यांनी रत्नागिरी गाठली आणि तेथून मित्राच्या दुचाकीने मालवण गाठले.
मालवण तालुक्यातील गावातून त्यांना तात्काळ पत्र देऊन तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तपासणीनंतर दोघांचीही विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली. मात्र रत्नागिरी ते मालवण असा दुचाकीने प्रवास करताना या दोघांनाही कुठेही थांबविण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
युवतीसह सहाजणांनी मुंबई ते दापोली पायी प्रवास केला होता. हाताला काम नाही, पोटाला दाणा नाही, अशा परिस्थितीत रेल्वे ट्रकवरून त्यांनी दापोली गाठली होती. दापोलीहून अत्यावश्यक सेवेच्या भाजीच्या गाडीतून या युवक-युवतीने रत्नागिरी गाठली. रत्नागिरी येथून दुचाकीने मालवणकडील आपल्या गावात त्यांनी शनिवारी सकाळी प्रवेश केला.
ग्रामपंचायतीकडून तात्काळ पत्र
यापूर्वी तालुक्यातील चौघांना कोरोनाबाधित रुग्णाच्या ट्रेनमधून प्रवास केल्याबद्दल विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची जागरुकता आहे. शनिवारी दोघे नव्याने गावात दाखल झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामपंचायतीला माहिती दिली. ग्रामपंचायतीने तातडीने पत्र देऊन त्यांना तपासणीसाठी जाण्याचे निर्देश दिले. पोलीस यंत्रणेकडून दोघेही तपासणीसाठी गेल्याचीही खात्री करण्यात आली.
विलगीकरण कक्षात रवानगी
रत्नागिरीहून मालवणात आल्यानंतर दोघांचीही प्राथमिक तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी केली. तपासणीनंतर त्या दोघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. सध्या हा विलगीकरण कक्ष तारकर्ली येथील स्कुबा डायव्हींग इमारतीमध्ये सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी नियमित दाखल असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना पुढील 14 दिवस ठेवण्यात येत आहे. चौदा दिवसांनंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येत आहे.
तिघांना घरी पाठविले
आजपर्यंत विलगीकरण कक्षात 11 जणांना ठेवण्यात आले होते. यातील तिघांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आता त्याठिकाणी आठ व्यक्ती होत्या. आता युवक व युवतीलाही त्याठिकाणी ठेवण्यात आल्यानंतर विलगीकरण कक्षात दहाजणांना ठेवण्यात आलेले आहे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
मालवणातील प्रवेश रोखणे आवश्यक
दरम्यान, मालवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुंबईहून येण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. या लोकांना रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच थेट गावात जाण्याचा प्रयत्न होत असल्याने भविष्यात धोका वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आताच मालवण तालुक्यात प्रवेश करणाऱया गाडय़ांची कडक तपासणी होणे आवश्यक बनले आहे. याबाबत वैद्यकीय विभागाकडून गांभिर्याने घेण्याचे आवाहन होत आहे.