मुंबई
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)चा वृद्धीदर हा चालू आर्थिक वर्षात 2021ते 22 मध्ये 8.5 टक्के राहणार असून आगामी वर्षात 2022 ते 23 या कालावधीत वधारुन 9.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज विदेशी ब्रोकरेज कंपनी गोल्डमॅन सॅच यांनी व्यक्त केला आहे.
मागील आर्थिक वर्षात(2020-21) देशाचा आर्थिक विकासदर हा 7.3 टक्के इतक्या टक्क्यांनी घसरला होता. परंतु यामध्ये सुधारणात्मक स्थिती निर्माण होत गेली आणि नंतर आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्या. आगामी वर्षात लसीकरणाची योग्य दिशा व त्यामुळे अर्थव्यवस्था संपूर्णपणे खुली होणार असल्याने त्याचा लाभ अधिक होणार असल्याचे गोल्डमॅन सॅच यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीच्या मते 2022 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावर्षी मागणी वाढण्यासोबत विकासालाही योग्य दिशा मिळणार आहे. सोबत गुंतवणूकही वाढणार असल्याचे अंदाजात गोल्डमॅन सॅचने म्हटले आहे.
एसबीआयचा 9.3 ते 9.6 टक्के अंदाज
दरम्यान यापूर्वी भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपला जीडीपी दर सुधारीतरित्या नुकताच मांडला आहे. एसबीआयच्या मते चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर हा 9.3 ते 9.6 टक्के इतका राहू शकतो. कोरोनाचे घटलेले प्रमाण व लसीकरणाला दिलेला वेग या पार्श्वभूमीवर एसबीआयने आपल्या अंदाजात आता बदल केला आहे. यापूर्वी बँकेने जीडीपी दराचा अंदाज 8.1 टक्के इतका वर्तवला होता.