राज्याशी विशेष नाते असल्याचे उद्गार
आपण दिल्लीत राहत असलो तरीही मन मात्र उत्तराखंडमध्येच संचार करत असते. गुजरातचा मुख्यमंत्री तसेच भाजप कार्यकर्ता असतानाही उत्तराखंडशी जोडला गेलेला होतो. उत्तराखंडमध्ये विकासासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. हे दशक उत्तराखंडचे असून यंदाची निवडणूक अधिक महत्त्वपूर्ण आहे, कारण याच्या नंतरच विकासकामांना पूर्वीपेक्षा अधिक वेग मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हर्च्युअल सभेला संबोधित करताना म्हटले आहे.
उत्तराखंडच्या कुमाऊंमध्ये नैनीताल समवेत 14 मतदारसंघांमध्ये व्हर्च्युअल सभा ‘विजय संकल्प सभे’ला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या दौऱयावर असणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण करत आला आहे. देशात फूट पाडण्याचे काम दशकांपासून काँग्रेसच्या सरकारांनी केल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
उत्तराखंडचे नुकसान करण्यास काँग्रेस पक्षाने कुठलीच कसर ठेवली नाही. विकासकामांमध्ये काँग्रेसने नेहमीच अडथळा आणला आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेमार्ग प्रकल्प असो किंवा ऑल वेदर रोडचा प्रकल्प, प्रत्येक कामात काँग्रेसने अडथळे आणले आहेत. काँग्रेसने पर्वतीय जिल्हय़ांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कुठलेच काम केले नाही असा दावा मोदींनी केला आहे.
चारधाम भव्य आणि दिव्य होणार असून याकरता ऑल वेदर रोडचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता कुठल्याही ऋतूत भाविक सहजपणे येऊ शकतील. कोरोना काळात दिल्ली सरकारने स्थलांतरितांना बसेसमध्ये भरून उत्तराखंडमध्ये परत पाठविले होते. लोकांसोबत एवढा मोठा अन्याय करून आता आम आदमी पक्ष उत्तराखंडमध्ये मत मागण्यासाठी आल्याची टीका मोदींनी केली आहे.
काँग्रेस कधीच विकासाबद्दल विचार करत नाही. काँग्रेसचे पहिले काम केवळ एका परिवारासाठी असते, तर दुसरे काम भ्रष्टाचाराचे असते. काँग्रेसचे तिसरे काम तुष्टीकरणाचे राजकारण करण्याचे असते. काँग्रेसचे चौथे काम प्रकल्प ताटकळत ठेवण्याचे असल्याचे मोदी म्हणाले.