14 व्या फेरीतील कोर कमांडर स्तरीय चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीन डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात 14 व्या फेरीतील कोर कमांडर स्तरीय चर्चा आयोजित करू शकतात. 14 व्या फेरीतील चर्चेसाठी चीनकडून अद्याप आमंत्रण मिळालेले नाही.
सशस्त्र दल 16 डिसेंबरपर्यंत 1971 च्या युद्धातील पाकिस्तानवरील विजय आणि भारतीय सैन्याच्या विजयाची सुवर्ण जयंती साजरी केली जात असल्याने भारतासाठी हा काळ उपयुक्त ठरणार आहे. सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि चीन पूर्व लडाख क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चर्चा करत आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांदरम्यान 13 व्या फेऱयांमध्ये चर्चा पार पडली आहे.
दोन्ही देश हॉट स्प्रिंग्समधील तणावावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करू इच्छित असल्याचे समजते. सैन्य स्तरीय चर्चा आणि विदेशमंत्र्यांमधील चर्चेत पँगोंग सरोवर आणि गोगरा हाइट्सच्या काठावरील फ्रिक्शन पॉईंटसंबंधीचा तणाव दूर करण्यात आला आहे. पण अद्याप देखील हॉट स्प्रिंग्सवरून तणाव कायम आहे. भारत डीबीओ क्षेत्र आणि सीएनएन जंक्शन क्षेत्रासंबंधी तोडग्याची मागणी करत आहे. हे दोन्ही जुने मुद्दे मानले जातात.
चीनच्या आक्रमकतेला भारताने आतापर्यंत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. क्षेत्रात शांतता प्रस्थापित व्हावी या मताचा भारत असून याच दिशेने काम करतोय. परंतु मागील काही महिन्यांमध्ये चीनची भूमिका चिथावणी देणारी राहिली आहे. याच भारताने चिनी सैन्याच्या दुस्साहसाला हाणून पाडण्यासाठी उच्चस्तरीय सैन्य तयारी कायम केली आहे. सद्यकाळात देखील सीमेवर दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. दोन्ही देशांनी मोठय़ा शस्त्रास्त्रांसह मोठय़ा संख्येत सैनिकांना तेथे तैनात केले आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अत्यंत समीप स्वतःच्या हालचाली वाढविल्या आहेत. चीनच्या हालचाली पाहून भारतानेही तेथील पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. सैनिकांसाठी रस्ते तसेच निवाससुविधा जलदपणे निर्माण करण्यात येत आहे.