मनपा आयुक्तांचा आरोप : महसूल निरीक्षकांना धरले धारेवर : नव्या मालमत्तांच्या नोंदीचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात दरवषी मालमत्तांची संख्या वाढत आहे. मात्र महापालिकेच्या दप्तरातील संख्या वाढत नाही. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या मालमत्तांची नोंद का केली नाही? असा मुद्दा महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी उपस्थित केला. नव्या मालमत्तांची नोंद करण्यास कोणती अडचण आहे, अशी विचारणा करून महसूल निरीक्षकांना धारेवर धरले. तसेच मालमत्तांची नोंद करा, असा आदेश बजावला.
महापालिकेच्या महसूल विभागाची आढावा बैठक सोमवारी घेतली. यावेळी महसूल विभागाच्या कारभाराची माहिती घेऊन ई-अस्ती प्रणालीवर नोंद करण्यात आलेल्या मालमत्तांची संख्या जाणून घेतली. शहर आणि उपनगरात दरवषी नव्या इमारतींचे बांधकाम होत आहे. पण मनपाच्या दप्तरातील संख्या वाढत नसल्याने या मालमत्तांची नोंद का करून घेतली जात नाही? अशी विचारणा महसूल निरीक्षकांकडे केली. शहरात 40 हजारहून अधिक मालमत्तांची नोंद मनपाने करून घेतली नसल्याची टीका आयुक्तांनी केली. मालमत्तांची नोंद करून घेण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला. सर्वांनी आपल्या जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी महसूल निरीक्षकांना दिला. सध्या 80 टक्के मालमत्ता कर जमा झाला असून उर्वरित 20 टक्के आणि नव्या मालमत्तांची नोंद करून शंभर टक्क्मयाहून अधिक मालमत्ता कर वसूल करण्याचा आदेश त्यांनी दिला.
पीआयडी क्रमांक देण्यास विलंब
नागरिक कर भरण्यासाठी येत असल्याने मनपाचा महसूल वाढत आहे. पण कर घेऊन पीआयडी क्रमांक देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मनपाचा कर बुडत आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्तेला पीआयडी क्रमांक देण्यात यावा. अशी सूचना केली. तसेच यापूर्वी ई-अस्तीचे काम रखडले होते. पण आता नवीन महसूल उपायुक्त रूजू झाले आहेत. त्यांना सहकार्य करून ई-अस्तीचे काम पूर्ण करण्याची सूचना आयुक्त रुद्रेश घाळी यांनी केली.
लिजवर दिलेल्या मालमत्तांचे भाडे थकले असून यापूर्वी भाडे वसुलीची जबाबदारी एकाच महसूल निरीक्षकांकडे सोपविली होती. मात्र आता लिज कराराने दिलेल्या मालमत्तांचे भाडे वसूल करण्याची जबाबदारी त्या-त्या वॉर्डमधील महसूल निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. बैठकीवेळी महसूल उपायुक्त, महसूल अधिकारी, साहाय्यक महसूल आयुक्त, महसूल निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.