काणकोण पालिकेने हटविले होते हातगाडे, छोटय़ा व्यावसायिकांना रस्त्यावर आणल्याबद्दल नाराजी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण पालिकेने अनधिकृत गाडे म्हणून चावडीवरील भाजी आणि मासळी मार्केटमधील काही हातगाडे हटविल्यानंतर त्याच मोकळय़ा जागी पूर्ववत सदर गाडेवाल्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. कोरोना महामारीच्या काळात छोटय़ा-छोटय़ा हातगाडय़ांवर व्यवहार करून आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविणाऱया कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले आहे आहेत. कित्येक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. असे असताना काणकोण पालिकेने छोटे हातगाडे चालवून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱयांना रस्त्यावर आणल्याबद्दल या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच हा मानवतेला कलंक लावण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
काणकोण पालिका क्षेत्रात चार रस्ता ते शेळेरपर्यंतच्या भागात प्लास्टिक, फळे, मासळी, भाजी विकणारे कित्येक परप्रांतीय आढळतात. या सर्वांना या ठिकाणी मुक्त मुभा आहे. काणकोण पालिकेला हा गैरव्यवहार चालतो आणि मागच्या 30 ते 40 वर्षांपासून या ठिकाणी छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविणारे चालत नाहीत. काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक या सर्व गोष्टी पाहून न बधितल्यासारखे करतात की काय आणि त्याचबरोबर हा सर्व गैरव्यवहार राजकीय पुढारी कसा सहन करतात, असा सवाल त्यांनी केला आहे.
चावडीवरील पालिका इमारतीसमोर चहाची टपरी चालविणारा जया, रेश्मा कोल्ड्रिंक्सच्या माध्यमातून चरितार्थ चालविणाऱया किसन नाईक याचे कुटुंबीय आणि अन्य आस्थापने जवळजवळ 25 ते 30 वर्षांपासून या ठिकाणी व्यवहार करत आलेली आहेत. त्यांच्याजवळ पालिकेचा परवाना आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून मिळालेला ना हरकत दाखला आहे. पालिकेच्या अधिकृत सोपो कर कंत्राटदाराला या व्यक्ती दररोज कर भरत आलेल्या आहेत. त्यातील जया याचा हातगाडा यापूर्वी पालिका इमारतीला लागून होता. तेथून त्याला हटवून ही नवी जागा देण्यात आली होती. कदाचित याचा हवा तो दस्तऐवज तयार करण्याच्या बाबतीत तो कमी पडला असण्याची शक्यता आहे. दिनेश नावाची व्यक्ती मागच्या 30 वर्षांपासून या ठिकाणी व्यवहार करत आलेली आहे. मटण शॉप चालविणाऱयाचीही अशीच गत आहे.
पर्यायी व्यवस्था करायला हवी होती मागच्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी व्यवहार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱया या व्यक्तींना हटविताना त्यांच्यासाठी पालिकेने पर्यायी जागेची व्यवस्था करायला हवी होती. पालिकेने मिळेल त्या ठिकाणी जे गाडे लावले होते ते हटविले ही गोष्ट खूपच चांगली आहे. मात्र ज्यांचे गाडे हटविले आहेत त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था करून द्यायला हवी होती, असे मत चावडीवरील एक नागरिक लेविन ग्रासियस यांनी व्यक्त केले. चावडीवरील पालिका उद्यानासमोर व कदंब बसस्थानकासमोर असलेले सर्व रस्सा ऑम्लेटचे हातगाडे कोरोना महामारीमुळे हलविण्यात आले आहेत. संचारबंदी हटविल्यानंतर हे सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या या सर्व व्यावसायिकांच्या तोंडचा घासच पालिकेने काढून घेतला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.