ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर लियॉन व जलद गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्या चर्चेतील मुख्य प्रश्न,
ऑक्टोबरमध्ये काही सामने बंदिस्त स्टेडियममध्ये होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ सिडनी
कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे नजीकच्या कालावधीत काही क्रिकेट सामने रिकाम्या स्टेडियमवर देखील खेळवले जाण्याची शक्यता मध्यंतरी चर्चेत होती. त्या पार्श्वभूमीवर, जागतिक स्तरावरील अव्वल फलंदाज, भारतीय कर्णधार विराट कोहली गॅलरीत प्रेक्षक नसताना, रिकाम्या स्टेडियममध्ये देखील त्याच जिद्दीने खेळणार का, असा प्रश्न ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लियॉन व जलद गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्या चर्चेदरम्यान उपस्थित केला गेला. भारतीय संघ यंदा वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणे अपेक्षित असून त्यातील कसोटी मालिका प्रेक्षकांविना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर, लियॉन व स्टार्क बोलत होते.
मुख्य लक्ष विराट कोहलीकडेच
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण, कोव्हिड-19 चे संकट असेच कायम राहिले किंवा त्याचे उपद्रवमूल्य कमी झाले नाही तर त्या दौऱयातील काही सामने बंदिस्त स्टेडियममध्ये चाहत्यांशिवाय खेळवले जाण्याची शक्यता आहे. एरवी विराट कोहलीचा खेळ प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे प्रचंड बहरतो. त्यामुळे, रिकाम्या स्टेडियमवर तो कसा खेळेल, याची पृच्छा लियॉन-स्टार्क यांनी या चर्चेत केली.
‘विराट कोहली कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेत, त्याला अनुरुप खेळ साकारु शकतो. पण, मी एकदा मिशेल स्टार्कशी बोलत असताना आमच्यात त्यावेळी प्रेक्षकांशिवाय सामने खेळवावे लागले तर त्यात विराट कसा खेळेल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. खरोखरच बंदिस्त स्टेडियममध्ये सामने झाले तर विराट कसा खेळेल, हे पाहणे औत्सुक्याचे असेल’, असे लियॉन म्हणाला. क्रिकेट.कॉम या वेबसाईटशी तो बोलत होता.
सुपरस्टार विराटची क्षमता निर्विवाद
‘बंदिस्त
स्टेडियममध्ये क्रिकेट खूप वेगळय़ा प्रकारची अनुभूती देणारे असेल. पण, विराट सुपरस्टार
खेळाडू आहे आणि कोणत्याही परिस्थितीला अनुरुप खेळ साकारण्याची त्याची क्षमता निर्विवाद
आहे’, असे लियॉनने पुढे नमूद
केले.
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे अवघ्या जागतिक स्तरावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कटले असून आंतरराष्ट्रीय व प्रथमश्रेणी क्रिकेट सर्व देशात पूर्ण ठप्प झाले आहे. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका पहिल्या सामन्यानंतर रद्द करण्यात आली. तरीही 32 वर्षीय लियॉनला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका होईल, अशी आताही अपेक्षा वाटते.
ऍशेसप्रमाणेच ही मालिकाही चुरशीची
‘ऍशेस चुरशीची होते. त्याचप्रमाणे ही मालिका देखील रंगतदार होईल, असा आमचा होरा आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात शक्य तितक्या लवकर दाखल व्हावा, अशी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. भारतीय संघ जागतिक स्तरावरील पॉवरहाऊस आहे. त्यामुळे, ही मालिका ऑक्टोबरमध्ये होणार असली तरी आतापासूनच त्याचे आम्हाला वेध लागले आहेत’, असे त्याने पुढे नमूद केले.
तो निर्णय परिस्थितीनुरुप
मालिका चाहत्यांशिवाय खेळवायची की चाहत्यांसह, हा निर्णय आपल्या कोणाच्याही हाती नसेल. कारण, त्यावेळी ज्याप्रमाणे परिस्थिती असेल, त्यावरच तो निर्णय बेतलेला असेल. पण, ती मालिका कोणत्याही परिस्थितीत होईलच, असा ठाम विश्वास वाटतो. जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ञ जे सांगतील, त्याचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे ठरेल, याचा लियॉनने येथे उल्लेख केला. लोकांच्या प्रचंड गर्दीसमोर खेळायचे आहे की रिकाम्या स्टेडियममध्ये, याचा आम्हाला अंदाज नाही. पण, भारताविरुद्ध खेळण्याची ही संधी आम्हाला महत्त्वाची वाटते, असेही तो म्हणाला. सध्याच्या घडीला क्रिकेट मागे पडले असल्याने कुटुंबाला वेळ देणे हा माझाही प्राधान्यक्रम आहे. सध्याची परिस्थिती प्रतिकूल जरुर आहे. पण, यातही सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे ठरेल, दिशादर्शक ठरेल, याचा त्याने शेवटी उल्लेख केला.
जागतिक चॅम्पियनशिप फायनलमध्ये
दोन सर्वोत्तम संघ खेळावेत
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे अनेक स्पर्धा, मालिका लांबणीवर टाकल्या गेल्या असून त्याचा फ्यूचर टूर प्रोग्रॅमवर विपरीत परिणाम होणे स्वाभाविक आहे. याचमुळे आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या कार्यक्रम पत्रिकेतही काही बदल होणे जवळपास निश्चित मानले जाते. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत 360 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान असून ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱया तर न्यूझीलंड 180 गुणांसह तिसऱया स्थानी आहे. या पार्श्वभूमीवर, स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक स्तरावरील दोन सर्वोत्तम संघ फायनलमध्ये खेळावेत आणि त्यातील दुसरा संघ ऑस्ट्रेलिया असावा, अशी अपेक्षा लियॉनने येथे व्यक्त केली.
भारत यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करणार का?
भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियन भूमीत 2018-19 मध्ये शेवटचा दौरा केला, त्यावेळी कोहलीच्या संघाने 2-1 असा रोमांचक विजय प्राप्त करत इतिहास घडवला होता. पण, त्या संघात स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश नव्हता. आता हे दिग्गज खेळाडू तर ऑस्ट्रेलियन संघात परतले आहेतच. शिवाय, ताज्या दमाचा मार्नस लाबुशाने संघाचा नवा भक्कम आधारस्तंभ म्हणून नावारुपास आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या मालिकेत भारताचा अधिक कस लागला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल, असा एकंदरीत सूर आहे.
‘मागील दौऱयात भारताने आमच्याविरुद्ध सहज मालिकाविजय संपादन केला. पण, आमचा आताचा संघ अधिक मजबूत, अधिक भक्कम आहे. त्यामुळे देखील आम्ही या मालिकेविषयी अधिक महत्त्वाकांक्षी आहोत’, असे लियॉनने नमूद केले.