मोहालीमध्ये बंदिस्त स्टेडियममध्ये सामना भरवण्याचा यापूर्वीचा निर्णय बदलला
मोहाली / वृत्तसंस्था
भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीची कारकिर्दीतील 100 वी कसोटी चाहत्यांच्या साक्षीने रंगेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बीसीसीआयने केली. भारत-लंका यांच्यातील ही पहिली कसोटी उद्यापासून (शुक्रवार दि. 4) मोहाली येथे खेळवली जाणार आहे. यापूर्वी, ही कसोटी प्रेक्षकांविना होईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मात्र, सुपरस्टार विराटसाठी हा नवा माईलस्टोन असल्याने 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा सुधारित निर्णय जाहीर केला गेला.
विराट कोहली आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील 100 वी कसोटी खेळत असताना चाहत्यांना त्या क्षणाचे साक्षीदार होता यावे, यासाठी पूर्वीचा निर्णय फिरवला असल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. पंजाब क्रिकेट संघटनेने एकूण प्रेक्षकक्षमतेच्या 50 टक्के प्रवेश दिला जाणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
या निर्णयाची तपशीलवार माहिती देताना जय शाह म्हणाले, ‘भारत व श्रीलंका यांच्यात मोहालीत होणारी पहिली कसोटी आता बंदिस्त स्टेडियममध्ये होणार नाही. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आणि यामागे अन्य काही घटकही आहेत. पंजाब क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयांशी याबाबत सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले’.
‘अलीकडेच विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवली गेली. मात्र, आता देशभरात कोव्हिड-19 रुग्णसंख्या घटत चालली असल्याने निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर, येथील लढतीत प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत विचार झाला. यापूर्वी, राज्य आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशानुसार, कोलकाता व धरमशाला येथे काही प्रमाणात प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला. लखनौमध्ये निवडणूक असल्याने त्यावेळी टी-20 लढतीत प्रेक्षकांना प्रवेश देता आला नाही. विराट कोहलीच्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी आम्हीही आतूर असून हा चॅम्पियन फलंदाज प्रदीर्घ कालावधीत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत राहील’, अशी आशा शाह यांनी पुढे व्यक्त केली.
पंजाब क्रिकेट संघटनेचे खजिनदार आरपी सिंग्ला यांनी बीसीसीआयकडून 50 टक्के चाहत्यांना प्रवेश देण्याबाबत दिशानिर्देश आल्यानंतर त्याबाबत कार्यवाही सुरु झाली असल्याचे नमूद केले. इतक्या कमी कालावधीत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सर्व तिकिटे ऑनलाईन उपलब्ध करुन देत असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी, विराट कोहलीची ही माईलस्टोन कसोटी बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवली जाईल, असे जाहीर केले गेले होते. मात्र, भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार असलेल्या विराटचा हा लँडमार्क साजरा करण्यासाठी बीसीसीआय पुरेसे नियोजन करत नसल्याची टीका सुरु झाली आणि मंडळाने हा निर्णय बदलत 50 टक्के चाहत्यांना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा केली.
पंजाब क्रिकेट संघटना विराटचा सत्कार करणार
मोहालीतील या सामन्यादरम्यान पंजाब क्रिकेट संघटना या निमित्ताने विराट कोहलीचा 100 व्या कसोटी सामन्यानिमित्त सन्मान करणार आहे. विराटने आजवर खेळलेल्या 99 कसोटी सामन्यात 50.39 च्या सरासरीने 7962 धावा फटकावल्या. यात 27 शतके व 28 अर्धशतके समाविष्ट आहेत.