भारतीय कर्णधार विराट कोहलीचे प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हिड-19 नंतरच्या जगात रिकाम्या स्टेडियमवर सामने खेळवले जाणे प्रत्यक्षात येऊ शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. पण, चाहत्यांशिवाय खेळण्यात नेहमीचा थरार, नेहमीचा रोमांच नसेल, असे ठोस प्रतिपादन भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या शोमध्ये तो बोलत होता. चाहत्यांशिवाय खेळणे आवडणार नाही. मात्र, तसे करावे लागले तरी नेहमीच्या जिद्दीने खेळण्यात आम्ही कसर सोडणार नाही, याचा त्याने येथे उल्लेख केला.
जागतिक स्तरावरील अनेक क्रिकेट नियामक मंडळे सध्या रिकाम्या स्टेडियमवर सामने आयोजित करण्याच्या प्रस्तावावर विचाराधीन असून अगदी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सामनेही आवश्यकतेनुसार प्रेक्षकांविना खेळवण्याची तयारी सुरु असल्याचे संकेत आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेवर देखील कोव्हिड-19 चे संकट आ वासून उभे आहे. त्या पार्श्वभूमीवर विराट बोलत होता.
‘प्रेक्षकांविना सामने आयोजित करावे लागतील, ही सध्या फक्त शक्यता आहे. तसे होऊ शकते. आता प्रत्येक जण ही बाब कशी घेणार आहे, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. पण, आम्हाला हजारो चाहत्यांसमोर खेळण्यातच अधिक आनंद वाटतो’, असे विराट येथे म्हणाला. ‘प्रेक्षकांशिवाय, सामने होतील, त्यावेळी खेळाडू नेहमीच्या जिद्दीनेच खेळतील. पण, सामन्यात प्रेक्षकांमुळे येणारी रंगत तेथे नसेल. दडपणाची स्थिती हाताळताना चाहत्यांमुळे वेगळीच रंगत असते. त्याचीही उणीव जाणवेल’, असे त्याने नमूद केले.
‘सामने त्यानंतरही खेळवले जातील. ते पूर्ण होतील, निकाल हाती येईल, धावफलक समोर असेल. पण, चाहतेच नसल्यामुळे खेळाची जान हरवल्यासारखी भावना असेल. खेळाडू आणि चाहते यांचे नाते अनोखे असते आणि चाहतेच नसतील तर नेहमीचा थरार येणेही कठीण असेल’, अशी पुष्टी त्याने पुढे जोडली.
अनेक खेळाडू चाहत्यांशिवाय खेळण्यासाठी राजी, पण, कशासाठी?
एकीकडे, विराटसारखा अव्वल खेळाडू चाहत्यांशिवाय खेळण्याची तयारी असली तरी त्यात नेहमीचा थरार नसेल, असे नमूद करत असला तरी अनेक खेळाडू असेही आहेत, ज्यांची रिकाम्या स्टेडियमवरही खेळण्याची तयारी आहे आणि त्यांनी ती जाहीरपणे बोलून देखील दाखवली आहे.
बेन स्टोक्स, जेसॉन रॉय, जोस बटलर व पॅट कमिन्स यांचा यात समावेश होतो. यातील पॅट कमिन्सने तर आयपीएल प्रेक्षकांविना खेळवा, अशी सूचना करण्यातही कसर सोडली नव्हती. अर्थात, चाहत्यांशिवाय खेळण्याची तयारी दर्शवताना त्याच्यासमोर आयपीएलचे गलेलठ्ठ पॅकेज होते. आयपीएल स्पर्धाच झाली नाही तर मानधन मिळणार नाही, त्यामुळे येनकेन प्रकारे आयपीएल स्पर्धा व्हावीच, असे मानणाराही खेळाडूंचा एक गट आहे. तूर्तास, आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आहे.