ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नऊ हजार रुग्णांची अतिरिक्त वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 46 हजार 164 रुग्णांची भर पडली तर 607 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 34 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी देशात 37,593 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 648 जणांचा मृत्यू झाला होता.
देशात आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 58 हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी 3 कोटी 17 लाख 88 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 3 लाख 33 हजार 725 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 लाख 36 हजार 365 वर पोहोचली आहे. तसेच देशातील रिकव्हरी रेट 97.63 टक्क्यांवर आहे. तर आठवडय़ाचा पॉझिटीव्हीटी रेट 2.2 टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट 2.98 टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या 31 दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा खाली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत 80 लाख 40 हजार 407 जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशातील 60 कोटी 38 लाख 46 हजार 475 जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.
- केरळमधील रूग्ण संख्येत वाढ
केरळमध्ये मागील 24 तासांत 31 हजार 445 रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण रूग्ण संख्या 38 लाख 83 हजार 423 वर पोहचली आहे. तर कालच्या दिवशी 215 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 19,972 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.