ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
जागतिक स्तरावर अनेक देशांच्या चिंतेत भर घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटचा फैलाव झपाट्याने होत आहे. या पार्श्वभुमीवर अनेक देशांनी कोरोना नियमावली आखत देत निर्बंध लागु करणे सुरु केले आहेत. याचबरोबर भारतात ही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचं वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत ही मोठी घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ६,९८७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ७ हजार ९१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ३० हजार ३५४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळो देशात सध्या ७६ हजार ७६६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ४ लाख ७९ हजार ६८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण १४१.३७ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील १७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वात जास्त १०८ रुग्ण आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत ७९ असून त्यापैकी २३ जण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये ४३ रुग्ण असून त्यापैकी १० जण बरे झाले आहेत. तेलंगाणामध्ये ४१, तामिळनाडूमध्ये ३८, केरळमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१ रुग्ण आढळले आहेत.