अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 6 ऑगस्ट 2021, सकाळी 10.00
●बाधितांची वाढ कमी-जास्त होतेय ● गुरूवारी 993 तर शुक्रवारी 566 रूग्ण वाढले ●9 हजार 839 संशयितांच्या चाचण्या ●जिल्ह्यातील निर्बंध वाढण्याची शक्यता ●पुणे जिल्हा नियंत्रणात; मात्र सातारा जिल्ह्यात अनियंत्रण
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख पाचशेच्या खाली जायला तयार नाही. सातत्याने रूग्णवाढीच्या आकड्यांंचे हेलकावे सुरू असून, पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात रूग्णवाढ हजाराच्या घरात होत आहे. पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या मानाने रूग्णवाढ नियंत्रणात आली असताना सातारा जिल्ह्यात मात्र रूग्णवाढ अचानक सहाशेवर येत आहे तर पुन्हा हजारीकडे झेपावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णवाढीवर अद्यापही म्हणावे तसे नियंत्रण आलेले नाही हे वास्तव आहे. दरम्यान, शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 566 नवी रूग्णवाढ झाली आहे.
रूग्णवाढीचा आलेख स्थिर नाहीच
सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख गेल्या पंधरा दिवसात स्थिर राहिलेला नाही. पुणे जिल्ह्यात बुधवारी अवघ्या 1025 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे 249, पिंपरी चिंचवड 171 तर उर्वरीत जिल्ह्यात 604 रूग्ण वाढले आहेत. तर संपुर्ण जिल्ह्यात 11 रूग्णांचे बळी गेले आहेत. गुरूवारी पुण्यात 1019 रूग्णांची वाढ झाली तर सातारा जिल्ह्यात 993 रूग्ण वाढले. याच दिवशी पुणे जिल्ह्यात 12 रूग्णांचे मृत्यू झाले तर सातारा जिल्ह्यात 16 रूग्णांचे मृत्यू झाले. पुण्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील मृत्यूदरही जास्त असून अपवाद वगळता मृत्यूदर हा 20 च्या पुढेच राहिलेला आहे. त्यामुळे रूग्णवाढीवर नियंत्रण का येत नाही? यावर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाने ठोस विचार करून योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहेे.
4 वाजता दुकाने बंद…तरीही रस्त्यावरील गर्दी रात्री 10 पर्यंत
जिल्ह्यात सध्या सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. जिल्हा अजुनही निर्बंधाच्या कचाट्यात आहे. मात्र शहरांसह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात दुपारी 4 नंतर दुकाने बंद असली तरी रस्त्यावरची वाहतूक कोंडी मात्र उशीरापर्यंत सुरू दिसते. पोलीस प्रशासनही आता कारवाईकडे कानाडोळा करत असल्याने गर्दी वाढताना दिसत आहे. निर्बंध केवळ नावालाच राहिल्याने पुण्यासारखा मोठा जिल्हा नियंत्रणात आला तरी सातारा जिल्ह्यातील रूग्णवाढ कायम आहेे.
सार्वजनिक ठिकाणी विनामास्क गप्पांचे फड
कराड शहरासह तालुक्यात रूग्णांची वाढ सर्वाधिक असताना सार्वजनिक ठिकाणी नियम पाळले जात नाहीत. गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेत अनेकांकडून मास्कचा वापर होत नाही. गल्ल्यांमधे चौकांत विनामास्क टोळक्यांचे गप्पांचे फड रंगत असून सायंकाळी पाचनंतरही हे गप्पांचे फड शहरासह परिसरात सुरूच असतात. विनामास्क कारवाईत प्रचंढ ढिलाई आली असून कराड तालुक्यावर कोरोनाबरोबरच डेंग्यू, चिकणगुणियाचे संकट गडद होत आहे.
जिल्हय़ात गुरूवारी एकूण बाधित 566, एकूण मुक्त 367, एकूण बळी 16
जिल्हय़ात गुरूवारपर्यंत एकूण नमूने 14,59,940 एकूण बाधित 2,21,174 घरी सोडलेले 2,09,304 मृत्यू – 5393 उपचारार्थ रुग्ण-10598