ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात बुधवारी एका दिवसात दहा हजाराचा टप्पा पार करुन एकूण 10 हजार 576 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 280 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 37 हजार 607 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
बुधवारी नोंद झालेल्या 280 मृत्यूंपैकी 58 मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 3.72 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 12556 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत एकूण 1 लाख 36 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एकूण 5 हजार 552 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.62 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 87 हजार 769 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 16 लाख 87 हजार 213 नमुन्यांपैकी 20 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 58 हजार 121 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 44 हजार 975 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.