संकट कोरोनाचे
चाकरमान्यांना गणपती पूजन करायला मिळावे म्हणून सरकारी निर्णय झाले. लोकांसाठी शेवटी कुठेतरी कायदा, नियम वाकवावे लागतात म्हणा. पण या सगळय़ांमध्ये आपलीही जबाबदारी तेवढीच वाढते.
गणपती उत्सवासाठी शासनाने काही मार्गदर्शक सूची जाहीर केल्या. काही अटी-शर्तीही घातल्या. फक्त त्याचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. दहा दिवसांच्या क्वारंटाईनचा निर्णय तर झालाच. पण RT PCR तपासणी केल्यानंतरच आणि ती निगेटिव्ह असेल, तरच कोकणात 12 तारीखनंतर प्रवेश देण्याचा आणि निदान तीन दिवस क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आज याची गरज होती. आज शासनाने निर्णय दिला खरा, पण आता सगळेच स्थानिक प्रशासन आणि लोकांच्या हातात आहे.
गेल्या आठवडाभरात रुग्ण संख्या जवळपास पंचवीस ते तीसच्या सरासरीने वाढत आहे. चिंतामणीच्या आगमनात ही पण गोष्ट चिंता वाढविणारी आहे. आपण बराच काळ संयमाने वागलो. पण आता कुठेतरी खरंच गरज असताना आपला संयम सुटत चाललाय असंच दिसतंय. बांधून ठेवलेल्या वासरासारखे सोडल्यानंतर आपण उधळल्यासारखे झालोय सध्या. आज हेच सगळं आपल्या या वाढत्या कोरोना संख्येला कारणीभूत आहे.
मित्रांनो, असे बेफिकिरीने वागू नका. धोका संपला नाही आहे, तर आता त्याची सुरुवात आहे. एकंदर शासन निर्णय पाहिलात, तरी स्थानिक प्रशासनाला फार जागरुकतेने काम करावे लागणार आहे. कोविड केंद्रांमधील क्षमता वाढविण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत, ही जमेची बाजू आहे. आदेशासोबत लागणारी साधनसामग्री आणि त्यासाठी लागणारा अन्य गोष्टींचा पुरवठा लवकरात लवकर व्हावा, हीच अपेक्षा आहे. जिल्हा रुग्णालयात लागणाऱया सुविधा यासुद्धा लवकरच मिळाव्यात. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत त्याचा उपयोग होईल. स्थानिक प्रशासनाने अजूनही काही गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्याची नितांत गरज आहे.
आज जास्तीत-जास्त भार ग्राम नियंत्रण समिती आणि स्थानिक आरोग्य कर्मचाऱयांवर पडणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन ती जास्तीत-जास्त सक्षम रितीने काम कसे करेल, हे पाहणे गरजेचे आहे. दहा दिवसांनंतर क्वारंटाईन असणाऱया लोकांना पुढील दहा दिवसांत लक्षणे दिसल्यास त्यांना संपर्क करणे, त्यांच्या पुढील तपासण्या करून घेणे, त्यांचे विलगीकरण करणे. तसेच बारा ऑगस्टनंतर तीन दिवसांचे क्वारंटाईन संपल्यावरही पुढील दहा दिवस लक्षणे आढळल्यास त्यांना पुढील उपचारासाठी, तपासणीसाठी लवकरात लवकर पाठविणे, याची सर्व जबाबदारी या सर्वांवर असणार आहे. त्यासाठी ग्राम नियंत्रण समिती आणि आरोग्य कर्मचारी यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
आज वाडीतील युवा मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. वाडीमध्ये साध्या पद्धतीने, जास्त गर्दी न करता उत्सव कसा साजरा करता येईल, याचे नियोजन करावे लागेल. मास्कशिवाय फिरणाऱया व्यक्ती, सर्दी-तापöखोकला असे आजार आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधणे, अशा लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी युवा मंडळींनी पुढाकार घेऊन जबाबदारीने वागले पाहिजे.
आज मोठय़ा बाजारपेठांमध्ये लोक मास्क न घालता फिरताना आढळत आहेत. स्थानिक व्यापारी बंधूंनी यासाठी एकत्र येऊन मास्क नसणाऱयांना सेवा न देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. लक्षात ठेवा मास्क न वापरणे जेवढे ग्राहकाला धोकादायक आहे, तेवढाच धोका तिथे काम करणाऱया व्यापारीवर्गाला पण आहे.
भजनी मंडळी, पौराहित्य करणारी मंडळी या सर्वांनी यंदा थोडंसं या सणात सावधानच राहवं. थोड लांब राहता आले, तर बघाच. कारण आज रोज वाढणारी रुग्णसंख्या पाहिली, तर धोका वाढतच चाललाय. यंदा फक्त आरोग्य सांभाळण्याकडे लक्ष देऊया. आपल्यासोबत दुसऱयांचे पण.
मित्रांनो, सरकारने आपले काम केलंय. आता आपली जबाबदारी आहे जबाबदारीने वागायची. आजही भीती कमी झालेली नाही. उलट ती आता वाढायला सुरुवात होत आहे. सणात दुसऱयाकडे जाणे शक्मयतो टाळाच. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता राखणे, याला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. ‘चिंतामणी’ येतोय म्हणून ‘चिंता मनी’ येतेय म्हणून तुम्हाला वारंवार हे सांगणे, ‘सांभाळा, काळजी घ्या’.