ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात सर्वाधिक म्हणजेच 3 हजार 900 नवे कोरोना रुग आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सहसचिव लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, लॉक डाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच गेल्या चोवीस तासात आज पर्यंतचे सर्वाधिक मृत्यूंची देखील नोंद झाली आहे. त्यानुसार, 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 1020 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातच दिलासा देणारी बाब म्हणजे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41 टक्के झाली आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, आत्तापर्यंत एकूण 12 हजार 726 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ते म्हणाले काही राज्यांकडून वेळेवर आकडेवारी मिळत नाही, ती आल्यावर आज हा आकडा अचानक वाढल्याचे दिसून आले आहे.
विदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्याची प्रक्रिया 7 मे पासून सुरु करण्यात येईल. तसेच विदेशातून आलेल्या भारतीयांना 14 दिवस क्वारंटाईन पेमेंट बेस वर ठेवण्यात येईल. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून देखील श्रमिकांसाठी आत्तापर्यंत 65 ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. जवळपास 70 हजार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
काही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. तेथील व्यवस्थापकांना सॅनिटायझर आणि मास्क ची सोय करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पालन करणे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू ॲप वर रजिस्ट्रेशन करावे असे आरोग्य विभागाकडून यावेळी सांगण्यात आले.