ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एका दिवसात कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात राज्यात 2940 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या त्यामुळे आता 44 हजार 582 वर पोहचली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट द्वारे दिली.
ते म्हणाले, गेल्या चोवीस तासात 857 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत 12 हजार 583 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 30 हजार 474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
विशेष म्हणजे, राज्यात आता पर्यंत 4 लाख रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर काल कोरोना मुळे 63 जणांचा मृत्यू झाला. 63 मृत्यूंपैकी मुंबईत 27, पुण्यात 9, औरंगाबादमध्ये 3, जळगावमध्ये 8, सोलापूरमध्ये 5, वसई – विरार मध्ये 3, साताऱ्यात 2, ठाणे, मालेगाव, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर आणि नागपूर शहरात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या मृतांमध्ये 37 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे.
63 मृत्यूंपैकी 28 जणांचे वय 60 वर्ष किंवा त्यावरील होते. तर 31 रुग्ण हे वय वर्ष 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर चार जण 40 वर्षाखालील आहेत. या 63 रुग्णांपैकी 46 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा स्वरूपाचे अति जोखमीचे आजार आढळले आहेत. कालच्या या 63 रुग्णांमुळे एकूण मृतांची संख्या 1 हजार 517 इतकी झाली आहे.