ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. मागील चोवीस तासात 3827 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 1935 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 62 हजार 773 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.49 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर पोहचली असून सध्या 55 हजार 651 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 142 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 114, वसई विरार 5, ठाणे 2, सोलापूर 1, औरंगाबाद 8, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव येथील प्रत्येकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 89 पुरुष आणि 53 महिला आहेत. त्यामुळे एकूूण मृतांची संख्या 5893 झाली आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 7 लाख 35 हजार 674 नमुन्यांपैकी 1 लाख 24 हजार 331 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 91 हजार 49 लोक होम क्वारंटाईनमध्ये तर, 25 हजार 697 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.