ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दीड लाखाचा टप्पा पार केला आहे. मागील चोवीस तासात 5024 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 2362 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 52 हजार 756 वर पोहचली असून सध्या 65 हजार 829 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 175 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी 91 मृत्यू गेल्या 48 तासातील आहेत. तर 84 मृत्यू मागच्या आठवड्यातील आहेत. 91 मृत्यूंमध्ये मुंबईत 73, नाशिक 3, ठाणे 2, मीरा भाईंदर 1, पिंपरी चिंचवड 1, नंदुरबार 1 आणि औरंगाबादमधील एकाचा समावेश आहे. राज्यात मृत्यू दराचे प्रमाण 4.65 टक्के आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 8 लाख 71 हजार 875 नमुन्यांपैकी 1 लाख 52 हजार 765 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 488 लोक होम क्वारंटाईनमध्ये तर, 36 हजार 903 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.