कोरोनाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतीने कसली कंबर : संपूर्ण गावात सॅनिटायझरने फवारणी: साडेतीन हजार मास्कचे वाटप
प्रतिनिधी / आचरा:
कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी चिंदर ग्रामपंचायतीने या एकवीस दिवसांत विविध उपाययोजना राबवून ग्रामस्थांना घरपोच सेवा देण्यावर भर दिला आहे. सरपंच भाग्यश्री घागरे, उपसरपंच अनिल गावकर, ग्रामसेवक पी. जी. कदम तसेच सर्व सदस्य, स्वयंसेवक यांची मेहनत ही सेवा पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यरत आहे.
ग्रामपंचायतीने नियोजन करून ठरलेल्यावेळी व दिवशी गावातील विविध वाडीत रेशनिंग दुकानदारांसह आवश्यक धान्य व वजनकाटा घेऊन ग्रामस्थांना धान्य वितरित करण्याचे नियोजन केले. रेशनिंग धान्याचा टेम्पो थेट ग्रामस्थांच्या घरानजीक आल्याने वाहतुकीचा खर्चही ग्रामस्थांचा वाचला आहे. गावातील गावठी भाजीचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना गावात फिरून भाजी विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावात वाटण्यात आलेले सुमारे 3500 मास्क गावातील बचतगटांना साहित्य पुरवून बनवून घेतले आहेत. संपूर्ण गावात सॅनिटायझेशन फवारणी पूर्ण करण्यात आली आहे.
गावातील सर्व रिक्षाचालकांना एखाद्या रुग्णाला आचरे येथील आरोग्य केंद्रात नेण्याचा वाहतूक खर्चही ग्रामपंचायत देणार आहे. याबाबतच्या आवश्यक सूचना गावातील रिक्षाचालकांना देण्यात आल्या आहेत. पन्नासपेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. श्रावण बाळ व गरिबांसाठी शासनाच्या असलेल्या विविध मानधन योजनेतील पैसे आचरा येथे जाऊन काढणे शक्य नसल्याने तातडीच्या कामासाठी अशा लाभधारकांना ग्रामपंचायतीकडून मानधनाच्या रकमेएवढे पैसे देण्यात आले आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे वितरण व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह तलाठी योगेश माळी, कवींद्र मालगावकर, कृषी सहाय्यक सुनील कदम, आरोग्यसेवक जी. बी. वडार, राजश्री कोदे, स्मिता जाधव, पोलीस पाटील दिनेश पाताडे, ग्रा.पं. सदस्य समीर लब्दे, सीताराम हडकर आदी सदस्य निवडण्यात आले आहेत. ग्रामस्थांना औषधे, किराणा माल घरपोच मिळावा, यासाठीही 24 स्वयंसेवक कार्यरत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर होताच व्हॉट्सऍपवर ‘कोरोना’ ग्रुप बनविण्यात आला आहे. सरपंच, उपरपंच, ग्रामसेवक पोलीस पाटील, अंगणवाडीसेविका, आशासेविका, ग्रामसदस्य, आरोग्यसेवक व वाडीतील स्वयंसेवक अशांचा ग्रुप बनविण्यात आला आहे. त्यामुळे गावातील वाडीवाडीत आवश्यक अत्यावश्यक सेवा, गावात आलेले नवीन ग्रामस्थ याची माहिती सरपंच तसेच शासनाच्या इतर जबाबदार कर्मचाऱयांना वेळीच मिळत आहेत. ग्रामपंचायतीतर्फे गावातील रिक्षाचालक, किराणा दुकान मालक, स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये असलेल्या सर्व सदस्यांचे संपर्क नंबर असलेले छापील पत्रक गावातील प्रत्येक कुटुंबाला वाटण्यात आले आहे.