वार्ताहर/ एकसंबा :
दिवसेंदिवस पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी चिकोडी व निपाणी तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तालुक्यांबरोबरच पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरुच असल्याने सीमाभागातील नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. वेदगंगा व दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून कृष्णेच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे. याबरोबरच संकेश्वर भागातही पावसाचा जोर वाढला असून हिरण्यकेशी आणि घटप्रभेच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या 5-6 दिवसापासून पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यात पडणाऱया पावसामुळे समाधान व्यक्त होत असले तरी पाणलोट क्षेत्रातील पडणाऱया पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये धडकीही भरत आहे. चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर, दूधगंगा नदीवरील मलिकवाड-दत्तवाड, तर निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील भोजवाडी-कुन्नूर, सिदनाळ-अकोळ, जत्राट-भिवशी, वेदगंगा-दूधगंगा नदीवरील कारदगा-भोज बंधाऱयावर पाणी आले आहे.
मांजरी येथील कृष्णा नदीची पाणीपातळी पाहता धोका पातळी 537 मीटर असून सध्या 528.21 मीटर पाणीपातळी आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीची धोका पातळी 538 मीटर असून सध्या 533.270 मीटर पाणीपातळी आहे. दूधगंगा नदीतून 15488 क्युसेक तर राजापूर बंधाऱयातून 46750 क्युसेक असे एकूण 62280 क्युसेक पाणी कृष्णा नदीत येत आहे. हिप्परगी धरणात 49 हजार क्युसेक पाण्याची आवक तर 48 हजार क्युसेक जावक आहे. तर आलमट्टी धरणात 49636 क्युसेक आवक असून 10088 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे. चिकोडी तालुक्यातील पावसाचे प्रमाण पाहता चिकोडी 3.3 मि. मी, अंकली 5.2 मि. मी, नागरमुन्नोळी 7.4 मि. मी, सदलगा 14.8 मि. मी, जोडट्टी 11.2 मि. मी पावसाची नोंद झाली आहे.
दुधगंगेचे पाणी दुसऱयांदा पात्राबाहेर
सदलगा : पाणलोट क्षेत्रातील राधानगरी, काळम्मावाडी पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी लावल्याने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळय़ात दुधगंगा नदीवरील जुना पुल दुसऱयांदा पाण्याखाली गेला आहे. जुना पुलावर 5 ते 6 फुट पाणी आहे. दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदी काठाची पिके पाण्याखाली गेली आहेत. तर शेतकरी विद्युत मोटर काढण्यासाठी धडपड करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
हिरण्यकेशीवरील बंधाराही पाण्याखाली
प्रतिनिधी/ संकेश्चर :
संकेश्वरसह परिसरातील तिसऱया दिवशीही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. याचबरोबर कोकण भागातही मुसळधार सुरु असल्याने हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य बनले होते. पहिल्या पावसातच हिरण्यकेशी नदीवर संकेश्वरजवळ बांधण्यात आलेला बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने प्रवाहासदेखील प्रचंड वेग प्राप्त झाला आहे. पुढील चार दिवस असाच पाऊस सुरु राहिल्यास नदीकाठच्या लोकांना स्थंलातर करावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नदीकाठची पाहणी करणार
पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे गुरुवारपासून नदीकाठच्या गावांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी करणार आहे. शिवाय महापूर येण्याची शक्यता असल्यास त्यादृष्टीने पूर्वनियोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अशोक गुराणी यांनी दिली.