वार्ताहर / चिकोडी
संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे भितीचे सावट पसरले असताना सार्वजनिक शिक्षण खात्याने पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या 27 मार्चपासून सुरू होणाऱया एसएसएलसी परीक्षा मात्र वेळेत होणार असून त्यासाठी चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील 132 केंद्रातून 40,221 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सदर परीक्षेची जय्यत तयारी शिक्षण खात्याने केली आहे.
कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण देशभरात अंगणवाडीपासून ते माध्यमिक शाळेपर्यंत खासगी व सरकारी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पण विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे वर्ष असलेल्या दहावीच्या परीक्षा मात्र वेळेवर घेण्यात येत आहेत. दहावी परीक्षेवरच विद्यार्थ्यांच्या जीवनाची रुपरेषा ठरविण्यात येते. त्यामुळे या परीक्षा व्यवस्थितपणे होण्यासाठी सार्वजनिक शिक्षण खात्याने कंबर कसली आहे.
चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील अथणी, निपाणी, चिकोडी, हुक्केरी, कागवाड, मुडलगी व रायबाग या आठ विभागांचा सहभाग आहे. या विभागातील 548 माध्यमिक शाळेतील 40 हजार 221 विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. यासाठी 123 परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून 49 केंद्रे ही क्लस्टर सहित तर 84 केंद्रे ही क्लस्टर रहित आहेत. यामध्ये मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी शाळेतील विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असल्याची माहिती सार्वजनिक शिक्षण खात्याचे चिकोडीचे उपनिर्देशक गजानन मन्नीकेरी यांनी दिली.
एसएसएलसी परीक्षा 2019-20 सालातील तालुका निहाय विद्यार्थी व केंद्र असे तालुका कोड एनए-01, अथणीमध्ये 89 माध्यमिक शाळेतील 5917 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्या ठिकाणी 21 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. एनए-02 निपाणी विभागात 54 शाळेतील 4205 विद्यार्थी 12 केंद्रातून परीक्षा देणार आहेत. एनए-03 चिकोडी विभागात 61 शाळेतील 4452 विद्यार्थी 17 केंद्रातून परीक्षा देणार आहेत. एनए-04 गोकाक विभागातून 56 शाळेतील 4324 विद्यार्थी 15 केंद्रातून परीक्षा देणार आहेत.
एनए-05 हुक्केरी विभागात 80 शाळेतील 6383 विद्यार्थी 25 केंद्रातून परीक्षा देणार आहेत. एनए-06 कागवाड विभागात 32 शाळेतील 2037 विद्यार्थी 6 केंदातून परीक्षा देणार आहेत. एनए-07 मोडलगी विभागात 74 शाळेतील 6381 विद्यार्थी 18 केंदातून परीक्षा देणार आहेत. तर एनए-08 रायबाग विभागात 102 शाळेतील 6522 विद्यार्थी 18 केंद्रातून परीक्षा देणार आहेत. सर्वात कमी परीक्षार्थी कागवाड विभागात तर सर्वात जास्त रायबाग विभागात परीक्षार्थी आहेत. सर्वच केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात आल्याचे मन्नीकेरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी
एकीकडे कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. आधीच अभ्यासाचे ओझे आणि आता कोरोना विषाणूमुळे विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पण विद्यार्थ्यांनी कोरोनाकडे लक्ष न देता स्वत: दक्ष राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. परीक्षा केंद्राबाहेर पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी न करता दूर रहावे व नेहमी मास्क वापरल्यास सोयीचे ठरणार आहे.