जलस्त्रोत व कृषी खात्याकडून पाहणी : पंधरा दिवसात बांध दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर / रेवोडा
गेले दोन दिवस पडत असलेल्या सततच्या पावसाने शापोरा नदीला आलेल्या पूरसदृष्य पाण्याच्या प्रवाहाने कोलवाळ पंचायतक्षेत्रातील मानस चिखली येथील बांधाला भगदाड पडून पाणी शेतजमिनीत घुसले. पाणी भातशेतीत घुसल्याने शेतीची नासाडी होण्याची भीती येथील शेतकऱयांनी व्यक्त केली आहे.
बांध फुटल्याची कल्पना पंचसदस्य दशरथ बिचोलकर यांनी जलस्त्रोत खाते, मामलेदार व कृषीखात्याच्या अधिकाऱयांना दिली. त्याप्रमाणे जलस्त्रोत खात्याचे अभियंते राजेंद्र वेर्लेकर, अभियंते संदीप शेटवेरेकर, विभागीय कृषी अधिकारी प्रकाश राऊत, तलाठी एनिस डिसोझा यांनी येऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱयांनी 15 दिवसाच्या आत बांध दुरुस्त करावा अशी मागणी केली. कोविड महामारीचा काळ आहे. मशागतीसाठी पैसेही खर्च केले आणि आता बांध फुटून शेतात पाणी गेले ते तसेच साठून राहिल्यास भातशेती कुजण्याची शक्यता असल्याने बांध 15 दिवसाच्या आत दुरुस्त करा अशी मागणी केली.