ज्येष्ठ दिग्दर्शक व पटकथालेखक बासूदा गेले अन मनाला तीव्र चटका लागला तो म्हणजे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा अवकाश व्यापणारा माणूस कायमचा हरपला याचा. अत्यंत तरल, संवेदनक्षम, कुशाग्र व चाकोरीबाह्य चित्रपटनिर्मिती करणाऱया मोजक्या दिग्दर्शकांपैकी बासू चटर्जी एक होते. बासूदांनी तब्बल चार दशकांहून अधिक काळ करोडो चित्रपटरसिकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. बासूदांनी वयाच्या 36 व्या वर्षी म्हणजे तशी उशिराच दिग्दर्शनाची कारकीर्द सुरू केली. पण चित्रपटविश्वात दबदबा असणाऱया हृषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य यासारखे दिग्गज दिग्दर्शक समोर असतानाही त्यांनी स्वतंत्र शैलीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. हे आव्हान त्यांनी सहज पेलले. कारण त्यांच्या चित्रपटात असणारा हलकेफुलकेपणा, सरळ आणि साधी कथा. एखाद्या निवांतक्षणी बसल्यानंतर हलकीशी वाऱयाची एखादी सुखद झुळूक यावी आणि आपल्याला स्पर्श करून मनाला प्रसन्नता मिळावी. बासूदांच्या चित्रपटांचे काहीसे असेच होते. स्वप्नरंजनापेक्षा खऱया आयुष्याचे वास्तव चित्र त्यात रंगवलेले असे. त्यात आपलेपणाही असे. म्हणूनच रसिक पेक्षकांच्या हृदयसिंहासनावर ते दीर्घकाळ अधिराज्य गाजवू शकले. के. जी. करंजिया यांच्या ब्लिट्झ या नियतकालिकामध्ये व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीस मुंबईत सुरुवात केली. दिग्दर्शनाची फार आवड होती अशातला भाग नाही पण दिग्दर्शकाचे सुप्त गुण त्यांच्या ठायी ठासून भरले हेते. चित्रपट पाहण्याचा पहिल्यापासून शौक होताच. मुंबईत फिल्मफोरम या फिल्म सोसायटी मूव्हमेंटच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना हॉलीवूडव्यतिरिक्त जगभरातील विविध भाषांमधील दर्जेदार चित्रपट पहायला मिळाले. याचवेळी त्यांना आपल्यातील दिग्दर्शनाच्या सुप्तगुणांची जाणीव झाली असावी. त्यानंतर खऱया अर्थाने ते चित्रपट निर्मितीकडे ओढले गेले. ते स्वत: प्रतिभावंत व्यंगचित्रकार. साहजिकच समाजातील बारकावे टिपण्याची सूक्ष्म नजर त्यांच्याकडे होती. दर्जेदार दिग्दर्शनाच्या माध्यमातून हे बारकावे प्रभावीपणे त्यांनी मोठय़ा पडद्यावर मांडले. राज कपूर, वहिदा रेहमानच्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटासाठी 1966 मध्ये त्यांनी प्रथम सहदिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. ज्येष्ठ दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी चटर्जी यांना या माध्यमातून संधी दिली. त्यानंतर ‘सारा आकाश’ या चित्रपटाचे बासू चटर्जी यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले. एक दिग्दर्शक म्हणून त्यांची खरी ओळख याठिकाणी झाली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मध्यमवर्गीय रसिक प्रेक्षकांना त्यांनी एकापाठोपाठ एक दर्जेदार सिनेमांची मेजवानी दिली. छोटीसी बात, रजनीगंधा, चित्तचोर, बातो बातो में, खट्टा मिठा, अपने पराए, पिया का घर हे त्यांचे लक्षवेधी सिनेमे. चंदेरी दुनियेतील डोळे दिपवणारा झगमगाट, भव्यदिव्य सेट, बिग बजेट, अतिरंजितपणा, अश्लीलता, हाणामाऱया यापासून हेतूपुरस्सर चार हात दूर रहात त्यांनी खासकरुन मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत साधे आणि आशयघन चित्रपट बनवले. मध्यमवर्गीयांच्या फटफजितीमधून निर्माण होणारी उच्च दर्जाची विनोदनिर्मिती हे त्यांच्या चित्रपटाचे खास वैशिष्टय़ म्हणावे लागेल. त्यांचा नायक टिपिकल मध्यमवर्गीय आयुष्य जगणारा, पापभिरु, सरळमार्गी, बंड न पुकारणारा पण छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधणारा असे. त्याची दुःखेसुद्धा साधी सरळ असत. सर्वसामान्यासारखा कपडे घालणारा नायक छोटय़ा छोटय़ा स्वप्नांच्या मागे धावायचा. या स्वप्नपूर्तीनंतर स्वत:वर खूश होणारा बासूदांचा नायक सुखवस्तू जीवन जगणारा मध्यमवर्गीय चेहराच असायचा. त्या नायकामधील साधेपणा व निरागसतेमुळे ते चित्रपट आपलेसे वाटत. म्हणूनच बासूदांचे सर्व चित्रपट मध्यमवर्गीय प्रेक्षकांपासून उच्च अभिरुचीच्या रसिकांनी उचलून धरले. छोटीसी बात या चित्रपटात त्यांनी आत्मविश्वास गमावलेला भिडस्त आणि लाजराबुजरा अरुण प्रदीप हा नायक अमोल पालेकरच्या रुपाने उभा केला. बसस्टॉपवर बसची वाट पाहणाऱया प्रभा नारायणशी (विद्या सिन्हा) त्याची नजरानजर होते. लव्ह ऍट फर्स्ट साईट यानुसार अरुण तिच्या प्रेमात पडतो. पण प्रेम व्यक्त करण्याची त्याची हिम्मत होत नाही. अगदी सुरक्षित अंतर ठेवून प्रेयसीचा पाठलाग करणारा एक मध्यमवर्गीय प्रियकर अखेर आपले प्रेम कसे मिळवतो, हे बासूदांनी अतिशय ताकदीने पडद्यावर आणले. रजनीगंधा, बातो बातो में यासारख्या सर्व चित्रपटात प्रेम व्यक्त करण्याचा उथळपणा त्यांनी दाखवला नाही की नायिकेला इशारा करून नायकाला आय लव्ह यू म्हणायला लावले नाही. छोटय़ा छोटय़ा कृतीतून प्रेम व्यक्त केले. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांना फार मोठे यश लाभले. वास्तविक तो काळ होता बच्चन, खन्ना, धर्मेंद्र व जितेंद्र इत्यादींचा. हिंदी चित्रपटसृष्टीचा पडदा या दिग्गज अभिनेत्यांच्या ऍक्शन, डान्स आणि हाणामाऱयांनी व्यापला होता. पण बासूदांनी जाणीवपूर्वक या आभासी जगाला फाटा देत तुमच्या आमच्यातला, मध्यमवर्गीय जाणीव देणारा वास्तववादी नायक पडद्यावर यशस्वी करून दाखवला, हे त्यांचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अमोल पालेकर, झरीना वहाब व टीना मुनीम या कलाकारांना खऱया अर्थाने बासूदांमुळे सिनेविश्वात ब्रेक मिळाला. सत्तर-ऐंशीच्या दशकातील सुपरस्टार अभिनेते देव आनंद, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जितेंद्र यांना देखील बासू चटर्जींच्या दिग्दर्शनाने भुरळ घातली होती. ऐंशी-नव्वदच्या दशकात छोटा पडदा लोकप्रिय होत असताना येथेही बासूदांनी आपला ठसा उमटवला. अन्यायाविरोधात बंड करून उठणारी, एका सजग नागरिकाच्या भूमिकेत मध्यमवर्गीय गृहिणी त्यांनी रजनीच्या रूपात छोटय़ा पडद्यावर आणली. वास्तविक ही महिलाप्रधान मालिका होती. त्यानंतर काही वर्षे महिलाप्रधान मालिकांचे छोटय़ा पडद्यावर प्राबल्य राहिले. व्योमकेश बक्षी ही गुप्तहेरावर आधारित रहस्यमय मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. सातवेळा फिल्मफेअर ऍवॉर्ड, आयफाचा जीवनगौरव पुरस्कार लाभलेले बासूदा खऱया अर्थाने समृद्ध आयुष्य जगले. त्यांच्या रूपाने दिग्दर्शनक्षेत्रातील मोठय़ा कालखंडाचा अस्त झाला आहे.
Previous Articleवटवृक्षाचे महत्त्व आणि त्याचे औषधी गुण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.