लेखक जॉन मॅथ्यू यांचे उद्गार
प्रज्ञा मणेरीकर / पणजी
लेखक किंवा दिग्दर्शक हे समाजाबद्दल संवेदनशील असले पाहिजेत. कुणाच्याबाबतीत आक्षेपार्ह न होता आपण आपला मुद्दा मांडू शकता. कोणत्याही चित्रपट निर्मात्यास समाजशास्त्र आणि राजकारणाचे घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे असे उद्गार इंडियन पॅनोरमा ज्युरी व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त लेखक जॉन मॅथ्यु मॅटन यांनी ‘इन कर्न्व्हसेशन’ कार्यक्रमात बोलताना काढले.
चित्रपटांत गाण्यांचा एक उद्देश असतो. जेव्हा सरफरोश चित्रपट बनला होता त्यावेळी कमाईच्याबाबतीत संगीत हा एक मोठा घटक होता. चित्रपटात दोन रोमँटिक गीते करण्याचे ठरविण्यात आले आणि मला ही कल्पना आवडली नाही. सध्याच्या काळात मार्केटिंग या घटकाची आवश्यकता नसल्याने चित्रपट निर्माता रोमँटिक गाणी ठेवण्यात जास्त प्राधान्य देत नाही. सरफरोशमधील गझल ‘होशवालों को खबर क्या’ ही दुहेरी संदेश देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. यान प्रेमकथेला जोडण्याव्यतिरिक्त भारत पाकिस्तानच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. परंतु आता जेव्हा मी सरफरोश 2 करेन तेव्हा याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेईन आणि कमी गाणी ठेवणार असे जॉन यांनी यावेळी सांगितले.
सरफरोश2ची पटकथा मी सुमारे पाच ते सहा वेळा लिहिली. जेव्हा मी पटकथा लिहिली तेव्हा मी तिच्या टीकेकडे पाहिले आणि बाजूला ठेवले. साधारण पाच ते सहा महिन्यानंतर मी पुन्हा सरफरोश 2 ची पटकथा लिहायला सुरूवात केली. आता सरफरोश2 ची ही प्रत्यक्षातली पाचवी पटकथा आहे जी ठरविण्यात आली आहे. सरफरोश 2ही भारताच्या अंतर्गत सुरक्षेबद्दल आहे. भारतात विविध समस्या असूनही भारताची सुरक्षा कशी मजबूत आहे याबद्दल चित्रपट दर्शवितो. तसेच विविध समस्यांना बळी पडणाऱया सीआरपीएफ अधिकाऱयांना हा चित्रपट समर्पित आहे अशी माहिती जॉन यांनी दिली.
मी मल्याळी असताना मला उर्दू भाषा आवडते. उर्दू ही एक सुंदर भाषा आहे. माझ्या मुस्लीम मित्रांकडून मी उर्दू कविता आणि गझलाबद्दलची रूची विकसत केली. माझे विचार मल्याळममध्ये येतात. परंतु मला मल्याळम लिहिता येत नाही. मी रोमन लिपी वापरून हिंदीमध्ये लिहितो असे जॉन यांनी सांगितले.