मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 51 व्या आंचिमचे शानदार उद्घाटन बहारदार संगीत कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली यंदाचा महोत्सव बांगलादेशाला समर्पित ‘द अनादर राऊंड’ चित्रपटाने पडदा उघडला बंगाली अभिनेते विश्वजित चटर्जी यांना इंडियन पर्सोनालिटी ऑफ द ईयर, तर इटालियन सिनेमाटोग्राफर व्हिट्टोरियो स्टोरारो यांना जीवनगौरव पुरस्कार
प्रतिनिधी / पणजी
चित्रपट निर्मितीसाठी गोवा हे सर्वाधिक पसंतीचे स्थळ बनविणार असून त्यासाठी लागणाऱया सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. त्यासाठी जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांनी गोव्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारताच्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ात मुख्यमंत्री बोलत होते. पर्यटन, मनोरंजन क्षेत्रात गोव्यात प्रचंड संधी आहेत. हे क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी गोवा विशेष भर देणार आहे. मनोरंजन हे प्रदूषणविरहित तसेच मोठी गुंतवणूक वाढविणारे क्षेत्र आहे. त्यामुळे अधिकाधिक निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांनी चित्रीकरणासाठी गोव्यात यावे, त्याचबरोबर गोमंतकीय तरुणांना चित्रपट निर्मितीतील विविध क्षेत्रात सहभागी होण्याची संधी प्राप्त करून द्यावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. जास्तीत जास्त गोमंतकीय तरुण या क्षेत्रात सहभागी झाल्यास आम्ही चित्रपट क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ शकणार, असेही ते म्हणाले.
बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियमवर आयोजित डोळ्यांचे पारणे फेडणाऱया या सोहळय़ास व्यासपीठावर त्यांच्या सोबत प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सुदीप संजीव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, बांगलादेशचे उच्चायुक्त मोहम्मद इम्रान, ज्युरी मेंबर प्रियदर्शन, ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, माहिती व प्रसारण सचिव निरजा शेखर, रवी कोटारकर, ए. के. वीर, धनप्रित कौर, पुनित गोयल, चैतन्य प्रसाद, अमित सतिजा आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते प्रारंभी प्रमुख पाहुणे सुदीप संजीव यांचा शाल घालून सन्मान करण्यात आला. सोनिया सिरसाट यांच्या ‘हाव सायबा पलतडी वयता’ या बहारदार रिमिक्स गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्याला जोडूनच गोमंतकीय पारंपरिक समई नृत्य, गोफण नृत्य, घोडेमोडणी यांचा रंगरंगिला मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांचे कार्य प्रशंसनीय
दरवर्षी हा महोत्सव नोव्हेंबर महिन्यात होत असे. यंदा कोरोना संकटामुळे तो दोन महिने पुढे न्यावा लागला. सध्या कोरोनावर मात करण्यात भारताने चांगले यश मिळविले आहे. जगातील अनेक देश जेथे आजही लॉकडाऊनच्याच स्थितीत आहेत, तेथे भारत बराच पुढे गेला आहे. याकामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आजपासूनच देशभरात कोरोना लसीकरण मोहिमही प्रारंभ झाली आहे, याचा आनंद होत आहे. यासाठी पंतप्रधान तसेच लस विकसित करणारे भारतातील वैज्ञानिक यांचे आपण अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे केवळ एक घोषवाक्य नसून ती सरकारची कटिबद्धता आहे, अंत्योदय ही केवळ विचारधारा नसून आमच्या दैनंदिन प्रशासनाची मार्गदर्शन शक्ती आहे. कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यात भारताने घेतलेला पुढाकार ही आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारत असल्याची साक्ष आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग भारताकडे विश्वगुरु म्हणून मोठय़ा आशेने पाहत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यंदाचा महोत्सव आपला शेजारी देश बांगलादेशास समर्पित आहे. तसेच यंदाचा महोत्सव हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून तो ऑडिटोरीयम तसेच ऑनलाईन मोडद्वारे दाखविण्यात येणार आहे.
गोवा राज्य विकासाच्या दृष्टीने पुढे जात असून आरोग्य आणि स्वच्छता यांना सर्वाधिक महत्त्व देण्यात येत आहे. तसेच भविष्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रात राज्य कोणत्या प्रकारे पाऊल मारेल याचा रोड मॅप ठरविण्यासाठी आम्ही तयारी केली आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
हृदयस्पर्शी कथानकावर आधारित चित्रपट निर्मितीवर भर द्या : जावडेकर
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भाषणात हृदयस्पर्शी कथानकावर आधारित चित्रपट निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. माणसाच्या जीवनात करमणुकीला प्रचंड महत्त्व आहे, कारण माणूस हा भावनाशील प्राणी आहे. भावनेच्या आधारेच तो जिवंत असतो. भावनेला हात घालणारे चित्रपट माणसाला रडवतात, हसवतात. चित्रपट पाहताना आपण त्या कथेशी एकरूप होतो. तिच्याशी आपले नाते जुळते. त्या संपूर्ण काळात एका वेगळ्याच विश्वात आपण पोहोचत असतो. कारण चित्रपटात एक कथा असते. ती कथा चांगली असेल तर ती आपल्या हृदयाला भिडते. चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरतो आणि चांगला चालतो, असे ते पुढे म्हणाले.
माणसाची प्रतिभा, बुद्धी, इच्छा, जिद्ध एवढी प्रबळ असते की प्रत्येक आव्हानाचा सामना करणारच याबद्दल त्याला जबरदस्त विश्वास असतो. त्यामुळेच कोरोनाशी सामना करताना केवळ वर्षभराच्या कालावधीतच लस तयार करून तिचा प्रत्यक्ष वापर सुद्धा प्रारंभ करण्यात यश मिळविले. याच आत्मविश्वासाच्या बळावर ’भारत जितेगा, कोरोना हारेगा’, असे पंतप्रधान वारंवार म्हणत होते, असे जावडेकर म्हणाले.
यंदाचा आंचिम कोरोनामुळे दोन महिने पुढे ढकलावा लागला असला तरी 52व्या आंचिमपर्यंत आम्ही कोरोनावर पूर्ण यश मिळविलेले असणार आणि तो महोत्सव नियोजित वेळेतच तसेच कोणतीही मार्गदर्शकतत्त्वे किंवा निर्बंध नसताना चित्रपटप्रेमींच्या खचाखच गर्दीत साजरा होईल, असा विश्वास मंत्री जावडेकर यांनी व्यक्त केला.
जगावर कोरोनाचे संकट असले तरीही तब्बल 85 चित्रपट निर्माण होतात आणि त्यांचे प्रीमियर होतात हे खूप मोठे यश आहे. भारतातही अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. तंत्रग्नज्ञानाच्या क्षेत्रात जग प्रचंड वेगाने पुढे जात आहे. भारतातही मोठय़ा संख्येने प्रतिभावंत लोक आहेत. जगभरातील तंत्रग्नज्ञानाचा येथे वापर होतो. त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहन श्री. जावडेकर यांनी केले.