वार्ताहर /माशेल
चित्रापूर मठाला दिलेला परवाना मागे घेण्याच्या मुद्दय़ावरुन कुंडई ग्रामसभेत प्रचंड गदारोळ माजला. आक्रमक बनलेल्या ग्रामस्थांना आवरण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मागील ग्रामसभा अशाच तणावपूर्ण वातावरणात तहकुब करावी लागली होती. काल रविवारी ही सभा पुढे कायम करण्यात आली.
सरपंच मोहन गावडे यांनी मागील ग्रामसभेनंतर पदाचा राजीनामा दिल्याने माजी सरपंच तथा पंचसदस्य रामू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे कामकाज सुरु झाले. मागील ग्रामसभेत पंचायतीच्या अर्थसंकल्पावरुन जोरदार चर्चा झाली होती. पंचायत मंडळाकडून त्यावर योग्य उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक बनल्याने सभा अर्ध्यावर तहकुब करण्यात आली होती.
कुंडई येथील कोमुनिदाद जमिनीवरुन चर्चा व चित्रापूर मठासाठी दिलेल्या परवान्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. चित्रापूर मठाला दिलेली परवानगी त्वरीत मागे घेण्याची मागणी करीत तसा ठाराव घेण्यात आला. हा परवाना केवळ फार्महाऊस बांधण्यासाठी दिला होता. पण प्रत्यक्षात मठाकडून निवासी इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. बोअरवेलही खोदलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या बागायतीसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. गावातील कोमुनिदादच्या जमिनी गावच्या विकासासाठी राखून ठेवल्या पाहिजेत, असे नागरिकांचे म्हणणे होते. कोमुनिदादच्या जमिनी पुढील पिढीसाठी जतन करुन ठेवल्या पाहिजेत. रामू नाईक यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत, याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. साधारण पाच तास ही ग्रामसभा चालली. सचिव सुशांत नाईक मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. गटविकास अधिकारी कार्यालयातील तुषार नाईक हे निरिक्षक म्हणून उपस्थित होते. सातपैकी सहा पंचसदस्य सभेला उपस्थित होते.