ऑनलाईन टीम / मुंबई :
भारत देशात उत्साहात साजरी केली जाणारी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधून जनजीवन सावरत असतानाच आर्थिक घडी मात्र पूर्णपणे विस्कटली आहे.
अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले असून अनेकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थिती दिवाळी साजरी तरी कशी करायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील जनतेला दिवाळी सणानिमित्त रवा, मैदा, साखर, तेल व तूप हे पदार्थ रास्त दरात रेशनिंगवर उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
चित्रा वाघ आपल्या पत्रात म्हणतात की, ‘आपल्याला कल्पना आहेच की, यावेळेची दिवाळी ही कोरोनाच्या सावटाखालीच आहे. त्यात लॉकडाउनने जनतेेचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेेले आहे. त्यामुळे दिवाळी सण कसा साजरा करावा? हा जनतेपुढे यक्ष प्रश्न आहे. या कठीण काळात घरसंसार चालवणे ही गृहिणींसाठी तारेवरची कसरत आहे.
त्यात मराठवाडा, विदर्भ, कोकण पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झाले आहे. या व अशा पार्श्वभूमीवर जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारकडून दिलासा म्हणून गहू, तांदूळ, चणाडाळ सोबतचं रवा, मैदा, साखर, तेल व तूप ही रास्त भावात स्वस्त धान्य दुकान(रेशनिंग वर) उपलब्ध करून द्यावे ही विनंती. राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी ओळखत आपण गोरगरीब जनतेची दिवाळी गोड कराल ही अपेक्षा आहे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.