अन्वेषण अधिकाऱयांचे वक्तव्य, मोठे कारस्थान उघड होण्याची शक्यता
नवी दिल्ली
आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करणारा आणि सध्या पोलीसांच्या अटकेत असणारा शारजील इमाम याने त्याच्या प्रक्षोभक आणि देशविरोधी भाषणांचे चित्रीकरण सत्य असल्याची कबुली दिली आहे. ही माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱया अधिकाऱयांनी दिली आहे. त्याने ही भाषणे काही दिवसांपूर्वी येथील जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरात दिली असल्याचे उघड झाले आहे.
देश तोडण्याची भाषा करणाऱया इमाम याच्यावर देशद्रोहाचा अभियोग सादर करण्यात आला आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये त्याला त्याने केलेल्या भाषणांच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. त्या त्याने नाकारल्या नाहीत. त्या सत्य असल्याचे आणि आपण तशी भाषणे केल्याचे त्याने मान्य केले आहे.
ध्वनिफीतींचा तपास करणार
इमाम याने कबुली दिली असली तरी त्याच्या ध्वनिफिती गुन्हावैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. कारण चौकशी सुरू असताना दिलेली कबुली न्यायालयात पुरावे म्हणून सादर होऊ शकत नाही. प्रयोगशाळांनी या ध्वनिफिती खऱया असल्याचे प्रमाणित केल्यास तो इमाम याच्या विरोधातील भक्कम पुरावा होऊ शकतो, अशी माहितीही देण्यात आली.
मंगळवारी अटक
शारजील इमाम याला गेल्या मंगळवारी अटक करण्यात आली होती. बिहारमध्ये अटक केल्यानंतर त्याला बुधवारी दिल्लीत आणण्यात आले. त्या दिवशी रात्रीच त्याला येथील मुख्य दंडाधिकारी पुरूषोत्तम पाठक यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. दंडाधिकाऱयांनी त्याला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. इमाम हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा पीएचडी आहे.
त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान अनुच्छेद 124 अ (देशद्रोह) आणि अनुच्छेद 153 अ (भिन्नधर्मिय समाजांमध्ये द्वेष भावना निर्माण करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे) यांच्या नुसार अभियोग सादर करण्यात आला आहे. तो न्यायालयात कोणती भूमिका घेतो याकडे तपास अधिकाऱयांचे लक्ष आहे.
शिक्षा कोणती होऊ शकते ?
देशद्रोहाचा गुन्हा हा अत्यंत गंभीर गुन्हा मानण्यात येतो. तो सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा मृत्यूदंडाचीही शिक्षा ठोठावली जाऊ शकते. शिक्षेची तीव्रता गुन्हय़ाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. या प्रकरणात आरोपीने देश तोडण्याची भाषा केलेली असल्याने आरोप सिद्ध झाल्यास त्याला मोठी शिक्षा होऊ शकते.