स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे राबविली जात असताना विनाकारण जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभारामुळे स्मार्ट सिटीऐवजी भकास सिटी होतेय की काय, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. मंगळवारी चिदंबरनगर भागात एक जुनाट वृक्ष तोडण्यात आल्याने रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चिदंबरनगर येथील 70 वर्षांचा जुना वृक्ष तोडण्यात आला. स्थानिकांना कोणतीही माहिती न देताच जुना वृक्ष तोडण्यात आला. जमीनदोस्त करण्यात आलेल्या वृक्षाचे ओंडके ट्रकमधून भरून नेण्यात आले. यामुळे परिसरातील निसर्गप्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शहरात असे प्रकार सर्रास घडत आहेत. स्मार्ट सिटीचे कंत्राटदार नागरिकांचा विरोध न जुमानता वृक्षांची कत्तल करीत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी नेमकी कोणासाठी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. वर्षानुवर्षे जपलेली झाडे आता मात्र विनाकारण तोडण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ लाकडे मिळविण्यासाठी झाडांची तोड होत आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सीएफओंचे कारवाईचे आश्वासन
शहरात सर्रास झाडांची विनाकारण तोड होत असल्याची तक्रार सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांनी बेळगावचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी बसवराज यांच्याकडे केली. त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन विनाकारण झाडे तोडली जात असतील तर अशांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.