वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
लडाख सीमेवर भारतीय सैनिकांच्या निर्घृण हत्यांना जबाबदार असणाऱया चीनला आर्थिकदृष्टय़ा घेरण्याची जोरदार तयारी भारताने केली आहे. सरकारी कंपन्यांनी चिनी बनावटीच्या वस्तू उपयोगात आणण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर आता रेल्वेने चिनी कंपनीला दिलेले 459 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले. आगामी काळात चीनकडून भारतात होणाऱया आयातीचे प्रमाण कमी ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून याचा फटका चीनला बसणार आहे.
लडाख संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारत व चीनमध्ये पुन्हा चर्चा झाली. चीनने त्याच्या सीमेत राहूनच ज्या कारवाया करायच्या असतील त्या कराव्यात. भारतीय सीमेत त्याने ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशारा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला दिला. येत्या 22 जूनला भारत-रशिया-चीन अशी संयुक्त बैठक होणार असून त्यात लडाखसंबंधी चर्चा होण्याची शक्यता भारताकडून फेटाळण्यात आली आहे.
राहुल गांधींचा आरोप फेटाळली
भारतीय सैनिकांना निःशस्त्र अवस्थेत चीनी सैन्यासमोर कसे नियुक्त करण्यात आले ? हा निर्णय कोणी घेतला ? अशी पृच्छा काँगेस नेते राहुल गांधी यांनी केली ट्विटरच्या माध्यमातून केली होती. मात्र राहुल गांधी यांची माहिती पूर्णतः अयोग्य आहे. सीमेवरील कोणताही सैनिक निःशस्त्र नसतो. चौकीतून बाहेर पडताना प्रत्येक सैनिक शस्त्रसज्ज होऊनच बाहेर पडतो, असे स्पष्टीकरण विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांनी दिले. भारतीय सैनिकांनी अनेक चीनी सैनिकांचा बळी घेतला असून ते मारता मारता हुतात्मा झाले आहेत,
असेही स्पष्ट केले.
चीनचा दावा अश्लाघ्य
गालवन खोऱयावर चीनने केलेला स्वामित्वाचा दावा पूर्णपणे खोटा आहे, असे भारतने स्पष्ट केले. चीनला असे अतिरंजित दावे करण्याची सवय आहे. मात्र त्यामुळे जमिनीवरील परिस्थिती बदलत नाही. गालवन खोरे पूर्णतः भारताच्या सीमारेषेत असून भारताचाच त्यावर अधिकार आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले. हे खोरे चीनने बळकावले असल्याचे काही जणांचे म्हणणे ही केवळ अफवा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारतीय सैनिक बेपत्ता नाहीत
चीनच्या सैनिकांनी काही भारतीय सैनिकांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. काँगेसने यासंबंधी सरकारकडून स्पष्टीकरण मागितले होते. तथापि, सर्व भारतीय सैनिक सुरक्षित असून कोणाचेही अपहरण झालेले नाही. तसेच कोणत्याही भारतीय सैनिक बेपत्ता नाही, अशी स्पष्टोक्ती विदेश मंत्रालयाने केली.
ठिकठिकाणी चीनचा निषेध
देशातील बऱयाच शहरांमध्ये बुधवारी व गुरूवारी चीनविरोधात मोर्चे व धरणे कार्यक्रम करण्यात आले. चीनी वस्तूंवर आमचा बहिष्कार अशा वाक्यांचे फलक मोर्चेकऱयांनी हाती घेतले होते. मोर्चांमध्ये असंख्य युवक सहभागी झाले होते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, वाराणसी, मथुरा, गया, पाटणा, रोहटक, पुणे, लखनौ, भोपाळ इत्यादी शहरांमध्ये मोर्चेकऱयांना चांगला प्रतिसाद लाभला. कोरोना विषाणूच्या काळातही लोकांनी घराबाहेर पडून सैनिकांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. चीनचा बदला घ्या, अशा मागण्या करण्यात आल्या.
पार्थिवावर अंत्यसंस्कार
लडाख संघर्षात वीरगती प्राप्त झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या पार्थिवावर तेलंगणा राज्यातील त्यांच्या मूळगावी अनेकांच्या उपस्थितीत सरकारी शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा चार वर्षांचा पुत्र अनिरूद्ध याने त्यांच्या पार्थिवाला अभिवादन केले तेव्हा उपस्थितांच्या डोळय़ांमध्ये अश्रू तरळले. संतोष बाबू यांच्या आप्तेष्टांना दुःख अनावर झाले होते. तथापि, आपल्या पुत्राने मातृभूमीसाठी प्राणार्पण केले याचा अभिमान त्यांच्या मातेने व्यक्त केला.
सुनिल कुमारांवरही अंत्यसंस्कार
लडाख संघर्षात हुतात्मा झालेले पाटणा येथील सुनिल कुमार यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा 10 वर्षांचा पुत्र आयुष याने त्यांना मुखाग्नी दिला. सुनिल कुमार यांचे मूळगाव बिहटा येथे हा अंत्यसंस्कार झाला. त्यांच्या पत्नी रिती कुमारी यांनी चीनचा बदला सरकारने घ्यावा अशी मागणी केली. अंत्यसंस्काराला सहस्रावधी लोक उपस्थित होते.