ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत आणि चीनमधील संघर्षांतर भारत चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर सीमाशुल्क वाढवण्याचा विचार करत आहे. एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादानंतर मागील महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यानंतर दोन्ही सैन्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने आवश्यक नसलेल्या चिनी वस्तूंची आयात कमी करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. चीनमधून आयात केलेल्या मालावरील शुल्क वाढण्यावर सध्या चर्चा सुरू आहे.
भारताच्या एकूण आयातीपैकी १४ टक्के आयात चीनमधून होते. एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात भारताने ६२.४ अब्ज अमेरिकन डॉलर कींमतीचा माल आयात केला आहे, तर शेजारी देशांची निर्यात १५.५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती.
चीनमधून आयात केलेल्या मुख्य मालांमध्ये घड्याळे, खेळणी, फर्निचर, गाद्या, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने, लोखंड, स्टील वस्तू, खते, खनिज इंधन आणि धातू यांचा समावेश होता.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने 500 प्रकारच्या 3000 चिनी उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची यादीही महासंघाने तयार केली आहे.