ऑनलाईन टीम / इटानगर :
अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याने पाच भारतीयांचे अपहरण केले आहे, असा दावा अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निनाँग एरींग यांनी केला आहे.
एरींग यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील 5 पाच भारतीय नागरिक गायब आहेत. त्यांचे भारत-चीन सीमेवर चिनी सैनिकांकडून अपहरण करण्यात आले आहे. प्रकाश लिंगलिंग नावाच्या व्यक्तीने त्याचा भाऊ प्रसाद रिंगलिंग आणि इतर 4 जणांचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अपहरण केल्याची बाब समाजमाध्यमांवर मांडली होती.
तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी या पाच नागरिकांची नावे आहेत. हे पाचही लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आले आहे, असे त्यांच्या कुटुंबियांनी भारतीय लष्कराची भेट घेऊन सांगितले.