प्रतिनिधी/ चिपळूण
नद्या गाळमुक्त करण्यासह चिपळूण पूरमक्त करण्यासाठी गेला आठवडाभर येथे सुरू असलेल्या नागरिकांच्या साखळी उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. सोमवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात पाच मंत्री, वरिष्ठ अधिकाऱयांची चिपळूण बचाव समितीबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वाशिष्ठी नदीतील गाळासंदर्भात बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे आता गाळाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे.
नद्यांतील गाळासंदर्भात गेला आठवडाभर प्रांत कार्यालयासमोर चिपळूणवासियांचे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री थोरात यांनी सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बंदरे विकास मंत्री असलम शेख, मंत्रालयातील विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी सहभागी होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे पालकमंत्री ऍड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच जयंत पाटील, आमदार शेखर निकम हे देखील चर्चेत सहभागी झाले होते.
मंत्रालयात दीड तास झालेल्या या बैठकीत चिपळूणचा पूर प्रश्न गंभीर असल्याचे सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र हा प्रश्न एकटय़ा महसूल विभागाशी संबंधित नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱया मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी संबंधित मंत्री, अधिकाऱयांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. त्यानंतर मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री थोरात यांच्यासह ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महसूलमंत्री थोरात यांनी महसूल विभागाशी संबंधित गाळाची बेटे काढण्यासाठी आवश्यक परवानगी दिली जाईल, असे सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आपण स्वतः या भागाची पाहणी केली असून हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण विभाग पूर्ण तयार आहे. कोणतीही अडचण येणार नाही. जे लागेल ते सर्व सहकार्य मी करेन, पण हा विषय फार मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे सुरुवातीला 5 महिने व नंतर दीर्घकाळ अशा दोन टप्प्यात गाळ काढण्याचे प्रयोजन करूया. माझ्या विभागाच्या सर्व परवानग्या मी लगेच देत असल्याचे सांगितले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्यक्षात यासंदर्भात कार्यवाही सुरू केली असून यांत्रिक विभागाला आदेश दिल्याचे सांगून आपण तत्काळ सर्व मशिनरी पाठवण्याची व्यवस्था करू, असा शब्द या बैठकीत दिला. बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी, मेरीटाईम विभागाकडूनदेखील कोणतीच अडचण येणार नसून तशा सूचना आजच देत असल्याचे सांगितले. मंत्री सामंत यांनीही यंत्रसामुग्री लावून गाळ काढणे आवश्यक असल्याचे सांगितले, तर आमदार शेखर निकम यांनी कोकणाने कधीच काही मागितले नाही, पण हे संकटच इतके मोठे आहे की आता तुम्हाला द्यावेच लागेल, कोकण व चिपळूणला या संकटातून वाचवा, तुमच्यासमोर हात जोडतो, असे भावनिक आवाहन केले.
या बैठकीत चिपळूण बचाव समितीच्यावतीने अरूण भोजने यांनी प्रास्ताविक, तर राजेश वाजे, शाहनवाज शाह यांनी तांत्रिक माहिती दिली. सतीश कदम, किशोर रेडीज यांनी सुरू असलेले उपोषण आता हाताबाहेर चालले असल्याने ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. निर्णय होत नाही तोपर्यत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला कॉंग्रेसची गर्दी
या बैठकीला काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई, प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, इब्राहिम दलवाई, अशोक जाधव, लियाकत शाह, अन्वर जबले अशा असंख्य पदाधिकाऱयांची गर्दी असताना राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपचा जिल्हय़ातील एकही पदाधिकारी निमंत्रण नसल्याने उपस्थित नव्हता.