चिपळूण
समाधानकारक पावसामुळे शहरातील 3 तलाव तुडुंब झाले आहेत. तलावातील पाणीपातळी वाढल्याने मगरींचा वावर वाढला आहे. तसेच तलावांभोवतीच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून देखभालीअभावी तलावांना झाडा-झुडुपांनी वेढले आहे.
तळय़ाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया चिपळूण शहरात बहुतांशी तळी बुजवली गेली असून आता केवळ तीन तळी शिल्लक आहेत. यामध्ये विरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव व नारायण तलावांचा प्रामुख्याने उल्लेख होता. यातील नारायण तलावाचे निधीअभावी सुशोभिकरण रखडले गेले आहे, तर विरेश्वर व रामतीर्थ तलावाची देखभालअभावी पडझड झाली आहे. सध्या हे तलाव पावसाचा जोर कायम असल्याने तुडुंब भरले आहेत. मात्र त्यांना झाडा-झडुपांनी वेढले आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे तलावात मगरींचा वावर वाढला असून त्या पाण्याबाहेर येत असल्याने धोका वाढला आहे.