गर्दी रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचा निर्णय
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरात भाजी, कांदे, बटाटे खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता नगर परिषदेने मंगळवारी भाजी मंडई परिसर सील केला आहे. येथे व्यवसाय करणाऱयांना नोटीस धाडण्यात आल्या, कांद्याचा टेम्पोही जप्त केला आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या महिनाभरापासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचा आता भाजीसह अन्य व्यावसायिक गैरफायदा घेताना दिसत आहेत. कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसून गर्दी केली जात आहे. त्यामुळे धोका ओळखून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी गर्दी टाळण्यासाठी भाजीमंडई परिसर सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता हा परिसर मोकळा झाला आहे. तसेच दुकानांमध्ये व्यवसाय करणाऱयांना नोटीस धाडण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास तसेच गर्दी झाल्यास करवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र असे असले तरी अनेकजण आजही अनधिकृतपणे भाजी, कांदा, बटाटा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नगर परिषदेने गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत व्यवसाय करणाऱयांचे साहित्य जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार कांद्याचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घाटमाथ्यावरील वाहतूक पूर्णपणे बदं करा: खेराडे
सध्या घाटमाथ्यावर कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. अशातच चिपळूण शहरासह तालुक्याला घाटमाथ्यावरूनच भाजी, अंडी, चिकन, कांदे, बटाटे याचा पुरवठा होतो. त्यामुळे याची वाहतूक करणाऱयांमुळे येथे हा रोग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे थांबवावी, अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
..तर कडक कारवाई करणार: डॉ. विधाते
मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही व्यावसायिकांना थोडी सूट देण्यात आली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याने भाजीमंडई परिसर सील करण्यात आला आहे. तसेच काही व्यावसायिकांना नियम पाळण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. तरीही नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.