प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण शहराची मोडतोड होऊ नये यासाठी महामार्ग उड्डाण पूल उभारणीला बहादूरशेखनाका येथे बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. यासाठी खोदकाम सुरू झाले असून लवकरच महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेतही बदल केले जाणार आहेत.
वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलापासून मातीच्या भराव टाकत बहादूरशेखनाका येथून युनायटेड हायस्कूलपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. साधारणपणे पावनेदोन कि.मी.चा हा उड्डाण पूल पूर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. उड्डाणपूल उभारणीच्या दृष्टीने शहरातील सर्व्हीस रोड तयार करण्याचे कामही वेगाने सुरू असतानाच परशुराम ते खेरशेत टप्प्याचे काम करणाऱया इगल इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीकडून बुधवारपासून पुलाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेखनाका येथे उभ्या राहणाऱया पहिल्या पिलरच्या पायाचे खोदकाम सुरू झाले आहे. उड्डाण पूल कामामुळे वाहतूककोंडीची शक्यता टाळण्यासाठी काही वाहतूक लवकरच सर्व्हीस रोडवरून वळवण्यात येणार आहे.
…