प्रतिनिधी/ चिपळूण
अतिवृष्टी आणि महापुरामुळे बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील खचलेल्या पुलाची डागडुजी झाल्यानंतर हा पूल सोमवारी सकाळपासून वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. अवजड वाहतुकीला मात्र बंदी घालण्यात आली आहे.
बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने बहादूरशेख नाका येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी महापुराने हाहाकार उडवल्यानंतर आलेल्या लोंढय़ात येथील दोन पुलांमधील मातीचा पंधरा मिटरचा भराव वाहून गेला होता. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी मोठमोठे दगड टाकून त्यावर कांक्रीटचा थर देऊन भराव करण्यात आला. रविवारी काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून हा पूल लहान वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यान, अवजड वाहतूक होऊ नये यासाठी आठ फुटावर कमान उभारण्यात आली आहे. मात्र अंदाज घेऊन दोन दिवसांनंतर अवजड वाहतूकही सुरू करण्यात येईल, अशी माहिती कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.
एकाचवेळी वाशिष्ठी आणि एन्रॉन पूल खचल्याने या मार्गावरील वाहतूकदेखील बंद आहे. यामुळे वाहनचालकांना पेठमाप पुलावरून ये-जा करावी लागत आहे. मात्र याठिकाणी मोठय़ाप्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, तर रस्तोरस्ती चिखल असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र महामार्ग सुरू झाल्याने कळंबस्तेसह वालोपे तसेच पंधरागांवमधील जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे.