प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील ओतारी गल्लीतील सोन्याच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱया कारागिराचे रविवारी रात्री 8.30 वाजता दीड कोटीच्या ऐवजासह अपहरण करण्यात आले. मात्र या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांनी ही कामगिरी केली. आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत हे अपहरण करण्यात आले. या तिघांना येथे आणण्यासाठी पथक गेले आहे ते आल्यावर बरीच माहिती पुढे येणार आहे.
अशरफ शेख (40) असे अपहरण झालेल्या कारागिराचे नाव आहे. शेख हे शहरातील ओतारीगल्ली परिसरात सोन्याचे दागिने बनवण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत. मूळचे पश्चिम बंगाल येथील असलेल्या शेख यांचे ओतारी गल्लीत छोटे दुकानही आहे. या दुकानात रविवारी रात्री 8.30 वाजता तिघेजण आले. त्यांनी शेख यांना आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत असे म्हणत इंग्रजीत संभाषण सुरू केले. आम्ही धाड टाकली आहे, तुम्हाला चौकशीसाठी आमच्यासोबत यावे लागेल तसेच दुकानात असलेले दागिने व रोख रक्कम घ्यावी लागेल असेही बजावले. त्याप्रमाणे शेख हे त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले. त्यांच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी 9 लाखाची रक्कम दिली होती. तसेच सोन्याचे दर कमी असताना त्यांनीही 2 किलो सोने खरेदी करून ठेवले होते. त्यामुळे नऊ लाख रोख व सोने असे मिळून एकूण 1 कोटी 60 लाख रूपयांचा ऐवज घेऊन ते एका कारमधून मुंबईच्या दिशेने शेख यांना घेऊन गेले.
मात्र महामार्गावर माणगाव येथे शेख यांना सोडून देत हे तिघेजण मुंबईकडे पळून गेले. त्यानंतर काहीवेळातच शेख यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच त्यांचे वर्णनही सांगितले. त्यानंतर चिपळूण पोलिसांनी सूत्रे हलवली. त्यांना हे तिघे पुण्याच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यानुसार पुणे पोलिसांशी संपर्क करून त्यांना याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार पुणे पोलिसांनी सापळा रचून या तिघांना कारसह ताब्यात घेतले आहे. त्यांना येथे आणण्यासाठी पोलिसांचे पथक पुणे येथे गेले आहे. ते आल्यावर बरीच माहिती पुढे येणार आहे. मात्र भर वस्तीच्या भागात हा प्रकार घडल्याने व्यापाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.